सातारा जिल्हाहोम

महिलांना समान हक्क, शिक्षण आणि सुरक्षेचे अधिकार देणे हाच तिचा खरा गौरव – माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील

कराड/प्रतिनिधी : – 

महिला दिनानिमित्त झालेला स्त्रीचा सत्कार म्हणजे केवळ औपचारिक सन्मान नसून, संघर्ष करणाऱ्या, कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला दिलेला सन्मान आहे. महिलांना समान हक्क, शिक्षण आणि सुरक्षेचे अधिकार देणे हाच तिचा खरा गौरव आहे असे प्रतिपादन माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

मारूल हवेली (ता.पाटण) येथे श्रीनिवास पाटील फाउंडेशन व ग्रामपंचायत मारूल हवेली यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी श्रीनिवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग पाटील, उपाध्यक्षा सौ.रचना पाटील, सरपंच सौ.अक्काताई मस्के आदी उपस्थित होते.

श्रीनिवास पाटील म्हणाले, स्त्री ही प्रतिकूल परिस्थितीत देखील आपले अस्तित्व सिद्ध करते. अनेक अडचणीवर मात करत कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आधार बनते. आता आधुनिकता आली असली तरी, जुने संस्कार, परंपरा, रीतीरिवाज जपण्यात महिलांचा खूप मोठा वाटा आहे. महिला म्हणजे कोण ? तर आई, बहिण, चुलती, मामी, आत्या. त्या आता प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. त्यांच्या कार्याचे कौतुक झाले पाहिजे.

सारंग पाटील म्हणाले, जागतिक महिला दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून महिलांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्याचा आणि समानतेच्या दिशेने समाजाने पुढे जाण्याचा संदेश देणारा दिवस आहे. मात्र माता-भगिनींनी आपाल्या कुटुंबासाठी दिलेल्या योगदानाचा, त्यांच्या त्यागाचा, कष्टाचा आणि समर्पित कर्तव्यनिष्ठेचा गौरव करण्याचा हा दिवस आहे. जेव्हा आपण महिलांना समान संधी देतो, त्यांच्या हक्कांचा आदर करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाज प्रगती करतो. केवळ एकट्या महिलेची प्रगती नाही, तर संपूर्ण समाजाची प्रगती होते. जेव्हा एक स्त्री उभी राहते, तेव्हा संपूर्ण कुटुंब उभे राहते.

याप्रसंगी गावातील शिक्षण, आरोग्य, प्रशासकीय, कृषि, व्यवसाय, रोजगार अशा विविध क्षेत्रातील महिलांचा तसेच निराधार महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles