महामंडळ कर्ज वितरणात अडवणूक करणाऱ्या बँकांवर कारवाईची मागणी
आदर्शमाता प्रतिष्ठानकडून निवेदन; तालुकास्तरीय समित्या स्थापण करण्याची शिफारस

कराड/प्रतिनिधी : –
राज्य शासनाच्या विविध मागासवर्गीय महामंडळांमार्फत मंजूर करण्यात येणाऱ्या कर्ज वितरण प्रक्रियेत राष्ट्रीयकृत बँकांकडून होत असलेल्या अडथळ्यांविरोधात आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, भटक्या जाती-जमाती आणि अल्पसंख्यांक समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ इत्यादी संस्थांच्या माध्यमातून मंजूर झालेली कर्ज प्रकरणे राष्ट्रीयकृत बँकांमार्फत वितरित केली जातात. मात्र, अलीकडील काळात काही बँका विनाकारण अतिरिक्त कागदपत्रांची मागणी करून लाभार्थ्यांना अडवणूक करत आहेत. काही ठिकाणी पक्षपातीपणा करत निवडक लाभार्थ्यांनाच कर्ज दिले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
या प्रकारांमुळे शासनाचा उद्देश आणि आर्थिक सक्षमीकरणाची प्रक्रिया खंडित होत असून, कर्ज वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर प्रशासनाच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र अशासकीय समित्या स्थापन कराव्यात. या समित्यांमध्ये महामंडळ, बँका, स्थानिक प्रशासन व अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी असावेत, तसेच नियमितपणे संयुक्त बैठका घेऊन अडचणी सोडवण्याची यंत्रणा विकसित करावी, अशी शिफारस प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे.
हे निवेदन ईमेलद्वारे, तसेच कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, संपतराव मोहिते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे कार्याध्यक्ष अस्लम शेख, बनवडीचे उपसरपंच मोहनराव जानराव, अख्तर आत्तार, पाडळी केसे ग्रामपंचायत सदस्य आनंदा बडेकर आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.