एमबीबीएस सरकारला हद्दपार करायला हवे – खा. सुप्रिया सुळे
गुरुपौर्णिमेनिमित्त यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी केले अभिवादन

कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारीमुळे जनता अडचणीत आहे. दूध, शेतमालाला भाव नाही. 118 कोटींचा भ्रष्टाचार फक्त शेतीमध्ये झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवल्या जाणाऱ्या पैसे सरकारने निकृष्ट बियाणे खरेदी करण्यासाठी वापरल्याचा आरएसएसनेच फडणवीस यांना सांगितले होते. कापूस, सोयाबीन, दूध, कांदा या कशालाच दर नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडायचे सरकारने ठरवले आहे. अशा एमबीबीएस म्हणजे महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी सरकार हद्दपार करायला हवे, असे मत खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी गुरुपौर्णिमेनिमित्त खा. सुळे यांनी अभिवादन केले. यावेळी माध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. यावेळी आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते.
खा. सुळे म्हणाल्या, गुरुपौर्णिमेनिमित्त चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळे अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. ते एक द्रष्टॆ नेते होते. त्यामुळे त्यांच्या विचारांवरच आम्ही मार्गक्रमण करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या, राज्य सरकार आरक्षणाच्या प्रश्नावर चालढकल करतय. 200 आमदार असतानाही ते बिल पास करू शकत नाहीत. त्यामुळे हे सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही. विरोधकांचा आवाज दाबण्याच काम हे सरकार करत आहे. पुणे डीपीडीसीतील प्रकारावरून हे सिद्ध होते. सातारचा पराभव जिव्हारी लागणारा आहे. दुर्दैवाने पिपाणी आणि तुतारीमुळे घोळ झाला. याच कारणाने दिंडोरीला दीड लाख मते गेली. परंतु, या पराभवबाबत आम्हीही आत्मचिंतन केले पाहिजे. महाराष्ट्राच्या विकासाबाबतीत सरकार गंभीर नाही. इन्कमटॅक्स, सीबीआय ईडीमार्फत घर, पक्ष फोडण्याचे उद्योग चालू आहेत. त्यामुळे जनतेने त्यांना मतदानातून उत्तर दिल्याचेही त्यांनी सांगितले.