सातारा जिल्हाहोम

विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न – प्रवीण दरेकर

ठाकरे बंधूंची विश्वासार्हता संपली, ‘सगळे झाल्यावर जागे होतात’ अशी टीका

कराड/प्रतिनिधी : –

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही राजकीय पक्ष स्वतःचे संपुष्टात येत असलेले राजकीय अस्तित्व वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करून भावनांशी खेळण्याचे काम सुरू आहे. आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता ओळखते, अशी टीका भाजपचे गटनेते तथा आमदार प्रवीण दरेकर यांनी केली.

बेलदरे, (ता. कराड) येथे दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताह तसेच ‘हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत देशी गोसंवर्धन व वृक्षारोपण अभियानाच्या कार्यक्रमानंतर आमदार दरेकर यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, विक्रम पावसकर, अजय पावसकर, एकनाथ बागडी, राहुल यादव, मुकुंद चरेगावकर, शिवाजी जाधव, सुनील शिंदे आदी उपस्थित होते.

आमदार दरेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कोणालाही सोडणार नाही’ असा स्पष्ट संदेश दिला आहे. मात्र, काही राजकीय पक्ष विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आधार घेत स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोण आंदोलनात आगीत तेल ओतत आहे आणि कोण खतपाणी घालत आहे, हे जनतेला स्पष्टपणे दिसत आहे. जनता सुज्ञ असून ती योग्य वेळी योग्य निर्णय घेईल.

ठाकरे बंधूंवर टीका करताना दरेकर म्हणाले, बैल गेला अन् झोपा केला, या म्हणीप्रमाणे ठाकरे बंधू सगळे झाल्यानंतर जागे होतात. त्यांच्या भूमिकांमुळे विश्वासार्हतेला तडा गेला आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार? अशी टिपण्णी त्यांनी केली.

दरम्यान, आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना केल्याचेही दरेकर यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि पुढील १० ते १५ वर्षे महाराष्ट्राला त्यांचे नेतृत्व लाभावे, अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी केली आहे, असे त्यांनी नमूद केले.

Related Articles