अधिवेशन संपण्यापूर्वी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावणार
आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मागणीवर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

कराड/प्रतिनिधी : –
उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी घेऊन, प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना विधानसभेत दिली.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेबाबत आज पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, उंडाळे योजनेवर आतापर्यंत सुमारे ८० टक्के खर्च झालेला असून, केवळ २० टक्के खर्च शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित निधी तात्काळ उपलब्ध करून दिल्यास ही योजना लवकर कार्यान्वित होऊ शकते. या योजनेअंतर्गत १८ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याने प्रकल्पातील प्रलंबित कामे लवकर पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे सांगून, संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावण्याची मागणी आ.डॉ. भोसले यांनी केली.
यावर उत्तर देताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिवेशन संपण्यापूर्वीच संबंधित विभागांची विशेष बैठक घेऊन प्रलंबित कामांचा आढावा घेतला जाईल व ती कामे लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असे स्पष्ट केले.
यामुळे उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पाणीपुरवठा मंत्र्यांसोबत मंत्रालयात केव्हा बैठक होते, याकडे या भागातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.



