जयवंत शुगर्सचा वजनकाटा अचूक

कराड/प्रतिनिधी : –
धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स कारखान्याच्या वजनकाट्याची जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार शासकीय भरारी पथकाने अचानक भेट देऊन तपासणी केली. त्यावेळी भरारी पथकाच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी, जयवंत शुगर्सचा वजनकाटा अचूक असल्याचे सिद्ध झाले.
सातारा जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आदेश दिले आहेत. यानुसार वजनमापे निरीक्षक योगेश अग्रवाल, लेखा परीक्षक डी. ए. जाधव, उप लेखापरीक्षक एस. एस. जंगम, आकाश कांबळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुनिल कोळी, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अशोक लोहार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम साळुंखे, शरद जोशी शेतकरी संघटनेचे तात्यासो पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे दिपक पाटील, अनिरुध्द होवाळ यांनी संयुक्तपणे जयवंत शुगर्स कारखान्याला अचानक भेट देऊन कारखान्याच्या ऊस वजन काट्याची तपासणी केली.
ऊसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजन करून, गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या फेरवजन करण्यासाठी परत इलेक्ट्रॉनिक वे ब्रीजवर बोलवण्यात आल्या. या चाचणीवेळी अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे या समितीला दिसून आले.
तसेच वजनकाट्याबाहेर लावलेल्या डिस्प्लेवर भरलेल्या गाड्यांचे व रिकाम्या गाड्यांचे वजन अचूकपणे होत असल्याचे दिसून आल्याने जयवंत शुगर्सचा वजनकाटा अचूक असल्याचा शेरा पथकाने दिला. यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी आर. टी. शिरसाट, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर अरुण खटके आदी उपस्थित होते.



