राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचे कराडमध्ये स्वागत

कराड/प्रतिनिधी : –
येथील शिवतीर्थ दत्त चौकात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचे सातारा जिल्ह्याच्या वतीने राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर प्रीतिसंगमावरील दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी ना. मकरंद पाटील यांच्यासह उपस्थितांनी चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.
यावेळी खा. नितीन पाटील, आ. सचिन पाटील, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, राजेश पाटील-वाठारकर, विजयसिंह यादव सादिक इनामदार, जितेंद्र डुबल आदी उपस्थित होते.
याप्रसंगी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला आहे. मात्र, यामध्ये धर्माचीच चर्चा का करताय? असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. या माध्यमांच्या प्रश्नावर बोलताना ना. पाटील म्हणाले, शरद पवार यांनी या हल्ल्याबाबत नेमके काय म्हटले आहे, हे मी पाहिलेले नाही. त्यामुळे त्याबाबत बोलणे उचित नाही. परंतु, दहशतवाद्यांना कुठला जात धर्म नसतो. ती एक विकृत मानसिकता आणि मनोवृत्ती असते. या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध संपूर्ण देशांने किंबहुना जगाने केला आहे. दुर्दैवाने यामध्ये निष्पाप २६-२७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती निश्चितपणे सगळ्यांच्या संवेदना आहेत. या भ्याड कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेबाबत बोलताना ना. मकरंद पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, देशाचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा मंगल कलश याठिकाणी आणला. विदर्भ, मराठवाडा, मुंबईसहित नव महाराष्ट्राची निर्मिती केली. त्याला ६५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभर हा दिवस मोठ्या उत्साहात, वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. पक्षाचे नेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ अशा मान्यवर नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम राज्यात मोठ्या प्रमाणात कालपासून साजरा व्हायला सुरुवात झाली आहे. राज्याच्या सहा विभागांतून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने व पराक्रमाने पवित्र झालेली माती, महाराष्ट्र सुजलम सुफलम करणाऱ्या पवित्र नद्यांचे जल, त्याचपद्धतीने महाराष्ट्र घडवण्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका पार अडलेल्या जिल्ह्यातील दिवंगत नेत्यांच्या गावांतील पवित्र माती एकत्रित करून तो मंगल कलश मुंबईला नेण्यात येणार आहे. १ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. पन्हाळगड येथून सुरुवात झालेल्या या रथ यात्रेची सांगता मुंबई येथे १ मे रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंगल कलशात कृष्णा, कोयनेचे पाणी
कृष्णा-कोयनेचे पवित्र जल, तसेच दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावरील माती असलेला मंगल कलश विरंगुळा याचव्हाण साहेबांच्या निवासस्थानापासून उंब्रज, सातारा, कै. क्रांतिवीर आबासाहेब वीर यांचे जन्मगाव कवठे, खंडाळा मार्गे सावित्रीबाई फुले यांचे नायगाव, शिरवळ, लोणंद मार्गे फलटणला जाणार आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडे हा मंगल कलश सुपूर्द करण्यात येणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.