सातारा जिल्हाहोम

जातीवाद्यांना रोखून पृथ्वीराजबाबांना पुन्हा नेतृत्व करण्याची संधी द्या – खा. सचिन पायलट 

पृथ्वीराजबाबांच्या प्रचारार्थ विराट सांगता सभा उत्साहात 

कराड/प्रतिनिधी : – भाजप, महायुती सरकारमध्ये सुरू असलेल्या पदाच्या लढाईवरून विकास काय होणार, हे तुमच्या लक्षात येईल. पृथ्वीराजबाबांना तुम्ही आजपर्यंत अनेकदा निवडून दिले. त्यांच्यासारखा सभ्य व अंगावर कोणताही डाग नसणारा हा नेता लाभला हे कराडकरांचे भाग्य आहे. बाबांनी मान, सन्मान आणि पदे मिळवली. त्यातून तुमची मान कोणासमोर झुकू दिली नाही. असा स्वाभिमानी नेता जपा. जातीवादी नेत्यांना कडवे उत्तर देत बाबांना पुन्हा राज्याचे नेतृत्व करण्याची संधी द्या, असे आवाहन खा. सचिन पायलट यांनी केले.
कराड येथील शिवतीर्थ दत्त चौकात झालेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, कर्नाटकचे माजी मंत्री विनयकुमार सोरके, काँग्रेसचे निरीक्षक प्रकाश नहाटा, कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पोपटराव साळुंखे, माजी नगरसेवक अरुण जाधव, माजी नगराध्यक्ष अशोकराव भोसले, अल्ताफ शिकलगार, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, फारूक पटवेकर, अर्चना पाटील, कराड तालुका शिवसेना प्रमुख नितीन काशीद, फारूक पटवेकर, यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
खा. पायलट म्हणाले, आ. पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या आई, वडिलांनी येथील जनतेची सेवा केली. परंतु, या निवडणुकीत विरोधक मतदारांना अमिष दाखवतील, त्याला भुलू नका. जनतेने भाजपचा लोकसभेत चारशे पारच्या घोषणेला धडा शिकवला. ईडी, सीबीआयचा वापर करून राज्यातील अनेक नेत्यांना आपल्या बाजूला घेतले. केंद्रातील डबल इंजिन सरकार दुसऱ्यांच्या कुबड्या घेवून उभे राहिले. तर महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकार फक्त धूर सोडत आहे. आम्हाला काम करणारे सरकार हवे आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना नागपूरला आणलेले दोन मोठे उद्योग देवेंद्र फडणवीस विसरत आहेत. कराडला जगातील दुसरे भूकंप संशोधन केंद्र असून अशी अनेक विकासकामे करून कराड हे जिल्हा पातळीवरचे गाव केले आहे, हा विकास न दिसणाऱ्या मंडळींना विकासाची व्याख्या समजलेली दिसत नाही.
ते म्हणाले, कराड शहर हे माझे घर आणि मतदारसंघ हे माझे कुटुंब आहे. तुमच्या आशीर्वादामुळे मला राजकीय उंची गाठता आल्याचे मी विसरू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मला दिलेल्या आंतरराष्ट्रीय नेत्याच्या पदवीचे मी स्वागत केले. मी काय सडक छाप राजकारणी नाही. असे मिश्किलपणे सांगत यशवंतराव चव्हाण यांची शिकवण आम्ही कायम जपली. पी. डी. पाटील यांनी कराडची जडणघडण केली. विलासकाकांनीही या मतदारसंघाची उंची वाढवली. याची जाणीव राखून मतदारसंघातील जनतेने कधीही जातीयवादी लोकांना थारा दिला नाही, देवू नये.
विकासकामे व प्रकल्प लाईट वेट नेते आणू शकत नाहीत. त्यासाठी राजकीय वजन लागते. ते विरोधी उमेदवाराकडे नाही. राज्याच्या हिताचे निर्णय मी पुन्हा घेईन. राज्य शिखर बँकेला वाचविण्याचा माझा हेतू स्वच्छ होता, त्याचा फायदाच झाला. सद्या कराड दक्षिणमध्ये वेगळी संस्कृती रुजवली जात आहे. कराडचे राजकारण बिघडू द्यायचे नाही. तुमच्या आशीर्वादातून मी उतराई न होण्याइतके ऋण माझ्यावर हे मी विसरू शकत. असे सांगताना कराड दक्षिणमध्ये पुन्हा इतिहास घडवूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, आ. पृथ्वीराज चव्हाण हे सर्वांना बरोबर घेवून जाणारे नेते आहेत. त्यांनी आयुष्यभर काँग्रेसची विचारधारा घेवून मार्गक्रमण केले. राज्यात सत्ता परिवर्तन घडेल, हे नक्की. त्यासाठी पृथ्वीराजबाबांना, त्यांच्या विचारांना तुम्ही साथ द्यावी.
माजी आ. रामहरी रुपनवर, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, शिवराज मोरे यांची भाषणे झाली. प्रा. दिपक तडाखे व राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगराध्यक्ष अशोकराव भोसले यांनी आभार मानले.
माझ्यामुळे उड्डाणपुलास 540 कोटी निधी 
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी केंद्रात मंत्री असताना राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी संजय मिश्रा माझ्याबरोबर काम केलेय. त्यांच्याकडून मी कराडचा उड्डाणपूल करण्यासाठी प्रयत्न केले. यातून 540 कोटी रुपयांचा पुल उभारला जात आहे. सिंगल पिलरची कल्पना मांडल्यामुळेच भविष्यात कराड उड्डाणपुलाची वाहतूक कमी होईल. राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक सुरळीत होणार आहे. त्यावेळेस चौदापदरी मार्ग करण्यासाठी प्रयत्न झाले नसते, तर हे काम झालेच नसते. यामुळे पुढील तीस वर्षांतील कराड आणि मलकापूर भागातील रहदारीचा प्रश्न सुटला असल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
आ. बाळासाहेब पाटील व आ. पृथ्वीराज चव्हाण एकत्र 
या सभेत आ. बाळासाहेब पाटील यांचे विचारमंचावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ते भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांच्या समवेत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले. दोन्ही नेत्यांच्या एकत्रित अभिवादनामुळे कराड शहरात सकारात्मक मेसेज केल्याची चर्चा सुरु आहे.

Related Articles