माझ्या खांद्याला खांदा लावून शंभूराज कायम सोबत राहिले – एकनाथ शिंदे
शंभूराज देसाई यांच्या निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा तांबवे येथे संपन्न...

तांबवे / प्रतिनिधी : –
पाटण मतदारसंघाने गेली दहा वर्षे शंभूराज देसाई यांच्या रूपाने कार्यक्षम, लोकाभिमुख आमदार आम्हाला दिला आहे. समाजाचे देणे देणारा नेता म्हणजे शंभूराज देसाई आहेत. त्यामुळे विरोधक जे अपप्रचार करत आहेत, त्यापासून मतदारांनी सावध राहिले पाहिजे. माझ्या खांद्याला खांदा लावून शंभूराज देसाई कायम सोबत राहिले आणि यापुढेही असणार आहेत, असे सांगत मतांचा पाऊस पाडा आणि शंभूराज देसाई यांना चौथ्यांदा प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदार बंधू-भगिनींना केले. पाटण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंभूराज देसाई यांच्या निवडणूक प्रचारार्थ तांबवे (ता. कराड) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा मंगळवारी संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला.
मंगळवारी तांबवे (ता. कराड) येथील बाजारतळ स्थळी शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रचार सभा झाली. यावेळी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई यांच्यासह प्रदिप पाटील, मिलिंद पाटील, दिलीपराव चव्हाण, प्रकाश पाटील, हणमंतराव चव्हाण, अशोकराव पाटील, सुरेश पानसकर, संतोष गिरी, पांडुरंग नलवडे, आनंदा कळके, प्रभाकर शिंदे, अशोक माने, संदिप सावंत, संदिप साळुंखे, विश्वास कणसे, शिवाजीराव गायकवाड, तुकाराम डुबल, प्रताप सूर्यवंशी, लक्ष्मण देसाई, जयवंत जाधव, सचिन पवार, संजय मुळगावकर, जालिंदर पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शंभूराज देसाई यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त करत उपस्थितांना संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. शंभूराज देसाई यांच्या रूपाने विकासकामे करणारा नेता पाटण विधानसभा मतदारसंघाला मिळाला आहे. शंभूराज देसाई हे पायाला भिंगरी लावून फिरणारे आमदार आहेत. शंभूराज देसाई यांनी कोविड काळात चांगले काम केले आहे. मतदारसंघात त्यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्याची पोचपावती येथील मतदार त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले की, पूर्वीचे सरकार बहिरे होते. महायुती सरकार हे लोकांचे ऐकणारे सरकार आहे. त्यामुळे विरोधकांकडून करण्यात येणारे फेक नरेटिव्ह पुन्हा पुन्हा चालणार नाही. आम्ही आमच्या लाडक्या माता-भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य दिले आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून दिलासा दिला आहे. शेतकऱ्याला आम्ही कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता देणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य आहे. मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना ज्येष्ठांसाठी राज्यात राबवण्यास सुरुवात केली आहे. राज्यात २२४ सिंचन प्रकल्पांना महायुती सरकारने मान्यता दिली. दिलेला शब्द पाळणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे. महायुती सरकारची ताकद वाढवली तर माझ्या माता-भगिनींना मला लखपती करायचा संकल्प आहे. सामान्य माणसाला सोन्याचे दिवस दाखवणारे हे सरकार आहे. दोन वर्षांमध्ये आम्ही जे काम केले त्याचा हिशेब द्यायला आम्ही तयार आहोत. आम्ही खुर्चीसाठी नाही तर जेवढे करू ते जनतेसाठी करू हाच आमचा अजेंडा आहे, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच माझ्या खांद्याला खांदा लावून शंभूराज देसाई कायम सोबत राहिले आणि यापुढेही असणार आहेत. आम्ही शिवसेनेत राहिलो आणि शिवसेना वाढवली. शंभूराज देसाई यांना विक्रमी मतांनी निवडून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.