असहाय्य शिक्षक, संवेदनाशून्य शासन व उदास पालक – अशोकराव थोरात
राज्यातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे अपयशी होत चालली असल्याची खंत

कराड/प्रतिनिधी : –
राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा व महाविद्यालयांमध्ये अपूर्ण शिक्षक व प्राध्यापक भरती, तसेच शिपाई, वॉचमन, महिला वॉचमन यांची भरती पूर्णपणे बंद करून राज्यातील 52 हजार पदे कायमची बंद करण्यात आली आहेत. म्हणजे शाळा, महाविद्यालयांना विद्यार्थिनी, शिक्षिका, स्त्री पालक यांचे संरक्षण करणे त्यांना संरक्षित वाटेल, असे वातावरण होणे अशक्य होत चालले असून महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे अपयशी होत चाललेली असल्याची चिंता महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, पुणेचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, राज्यात गेल्या काही दिवसांत विद्यार्थिनी, शिक्षिका व स्त्रियांच्या बाबतीत घडलेल्या घटना दुर्दैवी आहेत. त्याला एकप्रकारे आपणच सर्व जबाबदार आहोत, याचे भान प्रत्येकानेच ठेवले पाहिजे. शिक्षणामधून विद्यार्थी व समाजाचे प्रबोधन झाले पाहिजे, ते काम शिक्षक, शिक्षिका व प्राध्यापकांचे आहे. पण त्यासाठी शिक्षक, प्राध्यापक प्रवर्गाला पुरेसे वेतन, सुविधा, नोकरीतील शाश्वती, पुरेसा शिक्षक वर्ग व शैक्षणिक व्यवस्थेतील सहाय्यक कर्मचारी वर्ग मिळाला पाहिजे.
आज घडीला या व्यवस्थेतील शिक्षक हा घटक असाहाय्य झाला आहे. शिक्षकांवर शालाबाह्य कामे मोठ्या प्रमाणावर लादली जात आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक भरती केली जात नाही. शिक्षण क्षेत्रातून शासन अंग काढून घेत आहे. जिल्हा परिषदेची शाळा, शासकीय शाळा, खाजगी संस्थांची अनुदानित शाळा, महाविद्यालये कमी होत चालली आहेत. त्याऐवजी कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहित शाळा, महाविद्यालयांना मंजुरी दिली जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना फी भरून शिकावे लागणार आहे. म्हणजे समाजात गरीब विद्यार्थ्यांची शाळा व महाविद्यालये वेगळी व श्रीमंतांची वेगळी, असे चित्र निर्माण होत चालले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशासह राज्यात शिक्षक दिन साजरा केला जात असताना खरोखरच आपण शिक्षकांप्रति संवेदनशील आहोत का? याचा विचार पालक, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, शासन व शासकीय अधिकाऱ्यांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.