कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीस उच्च न्यायालयाची स्थगिती
6 ऑगस्टला होणार पुढील सुनावणी; याचिका कर्त्यांच्यावतीने केलेला युक्तीवाद ग्राह्य

कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या 21 जुलैला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सातारा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनच्या वतीने प्रा. अशोक चव्हाण व फिरोज पठाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात क्रिडा संहिता 2011 चे उल्लंघन झाल्याने निवडणुकीस स्थगिती मिळावी, अशी याचिका दाखल केली होती. याची दखल घेत उच्च न्यायालयाने सदर निवडणुकीस स्थगिती दिली असून 6 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती असो.चे विश्वस्त संजय शिंदे, नंदकुमार वाघ व खजिनदार सचिन पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या 21 जुलैला होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती मिळावी व क्रीडा संहितेचे पालन व्हावे, दिल्ली उच्च न्यायलयामधील क्रिडा संहिता पालन आदेशाचे उल्लंघन,राज्य कबड्डी असो.च्या निवडणुकीत होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सातारा जिल्हा हौशी कबड्डी असो.चे अध्यक्ष अॅड. प्रतापराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली याचिका दाखल करण्यात आली होती. याचिका कर्त्यांच्या वतीने अॅड. आशुतोष कुलकर्णी, अॅड. अभिनव चंद्रचुड, अॅड. वैभव गायकवाड यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. पुढील सुनावणीत सर्व जिल्हा संघटनांना बदल अर्ज, निवडणुक अहवाल सादर करण्यासाठी याचिका कर्त्यांच्यावतीने नोटीस पाठविण्यात येणार आहेत.
उच्च न्यायालयामधील दि. 19 च्या सुनावणीत राज्य कबड्डी असो.चे वकिल यांनी जिल्हा व राज्य कबड्डी संघटना राज्य रीट ज्युरीडीशनमध्ये येत नसल्याने निवडणुकीला स्थगिती देऊ नये, असा युक्तीवाद केला. यावर सर्व क्रिडा संघटना शासनाची अर्थिक मदत घेतात. विविध सुविधा घेतात. याच संघटनांच्या खेळाडूंना शासकिय नोकऱ्या उपलब्ध होतात. यासाठी या संघटना रीट ज्युरीडीशनमध्ये येतात, असा याचिका कर्त्यांच्यावतीने केलेल्या युक्तीवाद उच्च न्यायालयाने स्विकारत निवडणुकीस स्थगिती दिली आहे.