सातारा जिल्हाहोम

श्री कालिकादेवी पतसंस्थेने कराडच्या साहित्य क्षेत्रातील उणीव भरुन काढली – प्रा.डॉ. महादेव सगरे

कराड/प्रतिनिधी : –

पूर्वाश्रमीचे पाटण तालुक्यातील विष्णु उर्फ नानासाहेब देशपांडे यांनी कवि विहंग म्हणून कवितांच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर कराडचे नाव उंचावले. कवि विहंगांच्या स्मरणार्थ काव्य व गझल कार्यशाळा आयोजित करुन श्री कालिकादेवी पतसंस्थेने कराडच्या साहित्य क्षेत्रातील उणीव भरुन काढली आहे, असे प्रतिपादन भारती विद्यापीठचे सहकार्यवाह प्रा.डॉ. महादेव सगरे यांनी केले.

येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित; कराड आयोजित काव्य व गझल कार्यशाळेच्या उदघाटन समारोहात अध्यक्षस्थानावरुन प्रा.डॉ. सगरे बोलत होते. उदघाटक म्हणून श्री कालिका कुटुंब प्रमुख मुनीर बागवान-सावकार उपस्थित होते. व्यासपीठावर चेअरमन राजन वेळापुरे, कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे व म.सा.प. कराडचे सुधीर एकांडे, डॉ. सुहासकुमार बोबडे, प्रा.सौ. संध्या पाटील, संजय मोहिरे, शरदचंद्र देसाई उपस्थित होते.

प्रा.डॉ. सगरे म्हणाले, साहित्य व कवितेच्या प्रांतामध्ये नवनवीन प्रयोग सातत्याने होत असतात. परंतु, महाराष्ट्राच्या सांस्कृतीक पटलावर एखादी काव्य व गझल कार्यशाळा आयोजित केली जाणे हा अभिनव व दुर्मिळ उपक्रम आहे. आर्थिक व्यवहार संभाळून सामान्य माणसांची पत उंचवणाऱ्या श्री कालिकादेवी पतसंस्थेने सहकारी संस्थांसमोर एक अनुकरणीय उपक्रम ठेवला आहे.

डॉ. सुहासकुमार बोबडे म्हणाले, गझलचे तंत्र महत्वाचे आहे. परंतु, मराठीमध्ये गझल यशस्वी व न होण्याचे कारण म्हणजे या तंत्रामध्ये या तंत्रामध्ये चपखल बसणारे शब्द या भाषेत असूनदेखील सुरेश भटांसारखे गझलकार मराठी भाषेत झाले नाहीत. त्यामुळे केवळ तंत्र महत्वाचे नाही, तर भावनाही महत्वाची आहे.

गझल मार्गदर्शक प्रा. संध्या पाटील यांनी, गझल आणि भाषेचे सौंदर्य मात्रा आणि गण, तसेच गझल रसिकांच्या मन:पटलावर बिंबवण्यासाठी कोणती साधना करावी, याविषयी मार्गदर्शन केले.

प्रा. अशोककुमार चव्हाण यांनी, प्रास्ताविक केले. प्रा.डॉ. सौ. विजया पवार यांनी परिचय करून दिला. राजन वेळापुरे यांनी आभार मानले.

दरम्यान, कार्यशाळा सत्रामध्ये प्रा. पुरुषोत्तम देशपांडे यांनी, प्रास्ताविक केले. सौ. हेमा पाटील व प्रा. राहुल रोजोपाध्ये यांनी, प्रा. संध्या पाटील व डॉ.प्रा. सुहासकुमार बोबडे यांचा परिचय करून दिला. सौ. फरजाना डांगे यांनी सूत्रसंचालन केले. दुष्यंत देशपांडे यांनी आभार मानले.

या कार्यशाळेस संचालक श्रीमती जयाराणी जाधव, डॉ. जयवंत सातपुते, सुरेश कोळेकर, कराड पाटण परिसरातील कवी, गझलकार व साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles