कराडात २४ मे रोजी साहित्याचा महोत्सव
कालिकादेवी पतसंस्थेतर्फे आयोजित वेणूताई चव्हाण स्मृती मराठी साहित्य संमेलनात कथा, गझल, शाहिरी, दंगल कवितेची मेजवानी
कराड/प्रतिनिधी : –
साहित्य, संस्कृती आणि लोककलेचा संगम अनुभवण्याची संधी कराडकरांना २४ मे रोजी मिळणार आहे. येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने स्व.सौ. वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्व.सौ. वेणूताई चव्हाण स्मृती मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सोमवार पेठेतील नव्या श्री कृष्णाबाई प्रीतिसंगम सांस्कृतिक हॉलमध्ये सकाळी १० वाजता या संमेलनाचा शुभारंभ होणार आहे.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी चेअरमन राजन वेळापुरे, उपाध्यक्ष अनिल सोनावणे, संचालक अरुण जाधव, संजीव मोहिरे, कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे, तसेच समन्वयक प्रा. अशोककुमार चव्हाण उपस्थित होते.
या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत भूषविणार आहेत. उद्घाटक म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथील कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून कराड तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सूरज जमदाडे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार साळुंखे सहभागी होणार आहेत.
संमेलनात दिवसभर विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कथाकथनकार हिम्मत पाटील यांचे कथाकथन रंगणार आहे. त्यानंतर रेडिओ व दूरदर्शनवरील लोकप्रिय शाहीर कळसकर भेदीक शाहीर मंडळ, कवठे यांचा शाहिरी कार्यक्रम सादर होईल. पुढील सत्रात प्रा. डॉ. सुनंदा शेळके यांचा ‘गझल रंग’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. तर समारोपानंतर प्रसिद्ध दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांच्या दमदार दंगल कवितांनी संमेलनाची सांगता होणार आहे. कराड, पाटण आणि परिसरातील सुमारे ४०० साहित्यप्रेमी या संमेलनास उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सकाळी ८.३० ते १० या वेळेत संमेलनस्थळी नोंदणी करावी. नोंदणीनंतर उपस्थितांना ओळखपत्र देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पत्रकार परिषदेस संचालक डॉ. संतोष मोहिरे, शरदचंद्र देसाई, सुरेश भंडारी, राजेंद्रकुमार यादव, निरंजन मोहिरे, डॉ. जयवंत सातपुते, जयाराणी जाधव, सीमा विभुते, सुरेश कोळेकर, पारस विजापुरे तसेच संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.



