सातारा जिल्ह्यात भाजप एक नंबरचा पक्ष करणार – आमदार अतुलबाबा भोसले
जिल्हाध्यक्ष निवडीनंतर सातारा, कराडमध्ये जल्लोषी स्वागत

कराड/प्रतिनिधी : –
सुसंस्कृत राजकारण करत वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे भाजप एक नंबरचा पक्ष करणार आहेच. पण जिल्ह्यात भाजपच्या विचारांचा मतदार तयार करण्याचे काम भविष्यात करायचे असून जिल्हा खऱ्या अर्थाने भाजपचा बालेकिल्ला करणार असल्याचा निर्धार आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला.
आमदार डॉ. भोसले यांची नुकतीच भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर त्यांचे आज शुक्रवारी सातारा जिल्ह्याच्या सीमेवर भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी कराड येथे त्यांनी दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, विक्रम पावसकर, एकनाथ बागडी, सुहास जगताप, पै. धनाजी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना आमदार भोसले म्हणाले, लोकसभा व विधानसभेला यश मिळाले, म्हणजे जिल्ह्यात पक्षाचा मतदार तयार झाला असे नाही. आगामी सर्व निवडणुका तर जिंकायच्या आहेतच. परंतु, कसल्याही परिस्थितीत पक्षाचे मतदार वाढवण्याचे काम करायचे आहे. यासाठी जुन्या नेत्यांप्रमाणे नीतीमूल्ये जपणारे राजकारण करत केंद्र व राज्य सरकारच्या योजना, विविध विकासकामे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हाध्यक्ष म्हणून आपण करणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत विरोधी पक्षांपेक्षा मित्रपक्षांचे मोठे आव्हान आहे, याला कसे सामोरे जाणार आहात? या प्रश्नावर आमदार भोसले म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुतेक ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय माहितीच्या पक्षातील तिन्ही नेत्यांनी घेतला आहे. एखाद्या ठिकाणी महायुती म्हणून लढत झाली नाही, तर तिथे स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून योग्य निर्णय घेतला जाईल. तरीही भाजप सर्वांना बरोबर घेऊन महायुती सरकारला पोषक अशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून सत्तेच्या माध्यमातून लोकांना मदत करणार आहोत.
बाजार समिती आणि सह्याद्री कारखाना निवडणुकांची पार्श्वभूमी पाहताना महायुती म्हणून कसा ताळमेळ घालणार आहात? या प्रश्नावर ते म्हणाले, बाजार समितीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होतात. त्यासाठी राज्यस्तरावरील पक्षाचे धोरण अवलंबावे लागते. मात्र, सहकारी संस्थांच्या निवडणुका या सभासदांवर अवलंबून असतात. यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, जयवंतराव मोहिते यांनी राजकारणाचे जोडे सहकाराच्या मंदिराबाहेर काढावे, असे सांगितले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकाराच्या निवडणुका या पूर्णपणे वेगळ्या असून त्या त्या निकषांद्वारे त्या लढवल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
भोसले गट आणि भाजपा यामध्ये कसा समन्वय साधणार? यावर आमदार भोसले म्हणाले, भोसले गटाचे कार्यकर्ते हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत. कोणताही गटतट ठेवून चालणार नाही. पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच सर्वांना एकत्रपणे काम करावे लागेल. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपा सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न करेल, मतभेद कमी करण्याचा प्रयत्न होईल, असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत मदत केलेल्यांचा समतोल कसा साधणार? याचे आव्हान आहे का? यावर ते म्हणाले, नक्कीच याचे आपल्यासमोर अहवाल असेल. परंतु, योग्य पद्धतीने ते पेलण्याचा प्रयत्न राहील. विधानसभा निवडणूक या स्थानिक प्रश्नांबरोबर राज्याच्या प्रश्नावर असतात. वरिष्ठ पातळीवरून निधी व योजना आणून विकास व्हावा, यादृष्टीने त्या ठिकाणी मतदान होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी स्थानिक प्रश्नांना अधिक महत्त्व असते. त्यानुसार लोक मतदान करत असतात. यावेळी लोकांची भूमिका वेगळे असते. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर लोकांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कोल्हापूर नाका येथे नूतन जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर महात्मा गांधी पुतळा व शिवतीर्थ दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. तसेच आझाद चौक व चावडी चौकातही कार्यकर्त्यांची त्यांचे जल्लोष स्वागत केले.