वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण
गोटे ग्राम सचिवालयाचे उद्घाटन, वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा व कार्यकर्ता मेळावा उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –
वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा, असे स्पष्ट आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
गोटे (ता. कराड) येथे गोटे ग्राम सचिवालयाचे उद्घाटन, सौ. सुनंदा नामदेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा, तसेच वारुंजी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ॲड. उदयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेसचा विचार हा शाहू–फुले–आंबेडकरांच्या समतेच्या विचारांवर आधारित आहे. काँग्रेसने सत्तेत असताना जनहितासाठी काम करत अनेक लोकोपयोगी संस्था उभारल्या व योजना राबवल्या. मात्र आज राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत, लाखो तरुण बेरोजगार आहेत, ही गंभीर परिस्थिती असून सत्ताधाऱ्यांना त्याचे देणेघेणे नाही, अशी टीका त्यांनी केली.
उपमुख्यमंत्र्यांच्या गावात ड्रग्जचा कारखाना सापडतो, त्यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढविला. माणिकराव कोकाटे यांच्यासारखा भ्रष्टाचारी मंत्री सत्तेत आहे, राज्यावर दहा लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले असून जनतेची कररूपाने लूट सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आणि लोकोपयोगी काम करणारे लोकप्रतिनिधी निवडण्याची आज नितांत गरज आहे. नामदेव पाटील यांच्याकडे ही जाणीव आहे. त्यामुळेच त्यांच्या पत्नी सुनंदा पाटील यांना जिल्हा परिषदेत मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
नामदेव पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून वारुंजी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात विकासनिधी पोहोचला आहे. पंचायत समिती सदस्य असताना त्यांनी आपल्या वडिलांच्या प्रतिमेला साजेसे काम केले. भाजप सरकारने बांधकाम कामगार कल्याण खात्याचा निधी मतांसाठी वापरला, तर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मध्यान्ह भोजन योजना बंद करून भांडी वाटप योजना सुरू करण्यात आली, त्यामुळे मूळ लाभार्थी कामगार योजनांपासून वंचित राहिले, अशी टीकाही त्यांनी केली. शेतीमालाला हमीभाव व खतांवर सबसिडी देण्याची मागणीही त्यांनी मांडली.
प्रा. धनाजी काटकर यांनी, नामदेव पाटील यांच्या कार्याची प्रशंसा करत पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि ॲड. उदयसिंह पाटील यांच्या साथीने वारुंजी जिल्हा परिषद गटात काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन केले.
अजितराव पाटील – चिखलीकर यांनी, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्याला शिस्त लागली व महाराष्ट्र प्रगतीपथावर गेला होता, अशी आठवण करून दिली.
कार्यक्रमास सौ. सत्वशीला चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, इंद्रजीत चव्हाण, उत्तमराव पाटील, ॲड. अमित जाधव, अल्ताफ शिकलगार, वैशाली जाधव, अमृता पाटील, वहिदा शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य अन्वर मुल्ला यांनी प्रास्ताविक केले. विजय माने व शिवम डोंबे यांनी सूत्रसंचालन केले, तर श्री. इनामदार यांनी आभार मानले.



