सातारा जिल्हाहोम

पृथ्वीराजबाबांच्या तुलनेत विरोधकांकडे स्वकर्तृत्व नाही – सतेज उर्फ बंटी पाटील

कराड/प्रतिनिधी : – पृथ्वीराज चव्हाण यांचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत असलेला दबदबा सर्वश्रुत आहे. त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा अभिमान वाटावा, अशी देशभरात पृथ्वीराजबाबांची ओळख आहे. परंतु, विरोधकांकडे  सांगण्यासारखे काहीही स्वकर्तृत्व नाही. त्यामुळे ते पैशांचा वापर करत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी न पडता विरोधकांचा कंडका पाडा, घणाघात माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केला.
येथील विठ्ठल चौक व आंबेडकर चौकात महायुतीतर्फे काँग्रेसचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे प्रभारी प्रकाश नहाटा, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, खा. चंद्रकांत हंडोरे, अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. बंटी पाटील म्हणाले. यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण, पी. डी. पाटील यांनी कराडची ओळख निर्माण केली. पृथ्वीराजबाबांनी कराडची ओळख आपल्या कार्यातून पुढे नेली आहे. आता त्यांना आपण पुन्हा संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले,  भाजपकडून  जाती जातीत, धर्मात द्वेष पसरवला जात असून हा त्यांचा डाव आपण ओळखला पाहिजे.
खा. चंद्रकांत हंडोरे म्हणाले, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आयुष्यभर बहुजन हिताचा विचार जोपासला. त्यांचा विचार आणि ध्येय हे कराडच्या विकासासाठी कायम राहील. राज्याला पुन्हा त्यांच्यासारखे नेतृत्व लाभण्यासाठी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यात आणि केंद्रात असलेले भाजपचे सरकार शेतकरी, महिला व युवकांच्या विरोधातील सरकार आहे. शेतमालाला हमीभाव नाही, महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे त्रस्त झालेल्या जनतेचा आक्रोश लोकसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवातून दिसून आला. लोकसभेत महाविकास आघाडीला 65 टक्के लोकांनी कौल दिला. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा होईल. त्यानंतर महिलांना प्रतिमहा तीन हजार रुपये देणार, शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी, तसेच सुशिक्षित तरुणांना प्रतिमहा भत्ता देणार असून या योजनांचा सरकारी तिजोरीवर कुठेही भर पडणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Articles