आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्र

पत्रकारितेच्या काळात समाजाभिमुख लेखणी महत्त्वाची – माजी आमदार सुजितसिंह ठाकूर

 

धाराशिव / विशेष प्रतिनिधी : –

सध्या पत्रकारितेचे स्वरूप आणि प्रसिद्धीचे माध्यम वेगवान झाले आहे, हातात मोबाईल आल्यानं लेखणीचे स्वरूप बदललेले आहे, अशा स्थितीत समाजाभिमुख लेखनी महत्त्वाची आहे.असे मत माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी व्यक्त केले.धाराशिव या ठिकाणी ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पत्रकार कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार कमलाकर कुलकर्णी,अध्यक्षस्थानी होते.संघटनेचे अध्यक्ष गणेश कोळी,सचिव बाळकृष्ण कासार,उपाध्यक्ष गणेश गोडसे, ज्येष्ठ संपादिका शीला उंबरे-पेंढारकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राहुल कुलट यांची उपस्थिती होती.

प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवर हस्ते संपन्न झाले.संघटनेचे स्वरूप आणि कार्यशाळा संदर्भात प्रदेश सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत यांनी प्रास्ताविक व्यक्त केले.भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी सदस्य नितीन काळे यावेळी बोलताना म्हणाले, सबके बाद उस्मानाबाद ही जिल्ह्याची ओळख आता धाराशिव म्हणून झाली आहे. कानाला गोड वाटेल, कौतुक होईल अशा बातम्या वाचण्याची आणि ऐकण्याची सवय राजकारणी मंडळीला झालेली असते, त्यामध्ये तटस्थ आणि परखडपणे लिखाण करणारे पत्रकार देखील लेखणीतून नावा रूपाला येतात. प्रमोदजी महाजन यांचे नाव असलेल्या सभागृहात धाराशिव मध्ये ही कार्यशाळा होत आहे, याचा आपल्याला मनस्वी आनंद आहे. त्यांनीही पत्रकार म्हणून काम केले त्यांच्या सोबतीला भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी लेखणीचा छंद जोपासला अशी ओझरती आठवण काळे यांनी करून दिली.
पत्रकार मित्र संघटनेच्या राज्यस्तरीय पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून लाभलेले माजी आमदार ठाकूर यांनी विचार व्यक्त करताना म्हणाले,आत्ताची पत्रकारिता आणि मागच्या काळातील पत्रकारितेमध्ये खूप मोठा बदल झालेला

आहे.पत्रकारितेच्या माध्यमातून आपणाला समाजाचे प्रश्न समजले, त्यामुळे अधिकाऱ्यांकडून समाजातील गरजूंच्या अडचणी दूर करण्यासाठी आपली मदत झाली,त्या संपर्कातूनच नगरसेवक आणि त्यानंतर नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची आपणाला संधी मिळाली. पत्रकारितेमध्ये काम करत असताना,न्यायालयीन खटल्याला देखील आपण सामोरे गेलो, आपण दिलेली बातमी खरी होती हे संपादकाला पटवून सांगितले. आपण खुलासा छापणार असाल तर मी काम थांबवेल असा इशारा दिला होता. संपादकांनीही आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवला,न्यायालयीन कामकाजादरम्यान संपादकांना परंड्याला यावे लागले,काही काळानंतर हा खटला निर्दोष निघाला अशी आठवण देखील ठाकूर यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केली. समाजाला अपेक्षित असणारी, लोकाभिमुख पत्रकारिता समाजाची गरज आहे असे ठाकूर म्हणाले. यावेळी केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार,संघटनेचे संस्थापक यासीन पटेल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. उद्घाटन सत्राचे आभार पत्रकार सुधीर पवार यांनी मानले.

Related Articles