आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांशी संवाद

आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांशी संवाद
कराड/प्रतिनिधी : – महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहर व परिसरातील व्यापारी, व्यावसायिक ते थेट नागरिकांच्या घरी जावून भेटी देत संवाद साधला. याला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत बाबांना बहुमताने निवडून देण्याचा निर्धार केला.
आ. पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ प्रतिमा, निष्कलंक कारभार व उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा देशात आहे. त्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे रुप पालटले. त्यांनी कराडमध्ये मध्यवर्ती बसस्थानक, सुसज्ज प्रशासकीय इमारत, पोलीस वसाहत, कृष्णा नदीकाठी संरक्षक भिंत, शहराला जोडणाऱ्या पाच प्रमुख रस्त्यांचे विस्तारीकरण, भूकंप संशोधन केंद्र, एम – एच ५० व आरटीओ ऑफिस, शासकीय कृषी महाविद्यालय या प्रमुख गोष्टी उभारल्या.
कराड जिल्हा करण्यासाठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा त्यांनी उभारल्या. या बळावर आ. पृथ्वीराज चव्हाण यांना कराड शहरात प्रचारादरम्यान संवाद साधताना प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी शहरातील व्यापारी, व्यावसायिक ते थेट नागरिकांच्या घरी जावून भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांचे नागरिकांनी उस्फूर्तपणे स्वागत केले. ठिकठिकाणी सुज्ञ नागरिकांनी आपल्या भावना मांडल्या.
पृथ्वीराज बाबांकडे विकासाची दूरदृष्टी असून त्यांनी कोणताही भेदभाव न करता आपले कार्य सुरू ठेवले आहे. त्यांनी केलेल्या विकासामुळे कराडला वेगळी ओळख मिळाली. अशा नेत्याच्या पाठीशी राहण्याचा निर्धार कराड शहरातील नागरिकांनी केला आहे.
आ. चव्हाण म्हणाले, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात १८०० कोटी रुपयांची कामे केली. आता आपला मतदारसंघ आयडॉल करण्याचा मानस ठेवून योजना आखली. यास मोठे यश मिळाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. त्यानंतर विरोधी सदस्य म्हणून आम्हाला विकास निधी देताना भाजपने खूप कुचराई केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासाची घडी बसविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तोच कोरोनाची महामारी आली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करून पुन्हा भाजपचे सरकार आणले. भाजपने निधी दिला नाही. तरीही आम्ही जवळजवळ १५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला.