सातारा जिल्हाहोम

संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे – पृथ्वीराज चव्हाण आक्रमक

उच्चपदस्थांचे राजीनामे घेऊन कडक कारवाईची मागणी

कराड/प्रतिनिधी : –

संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी होऊन देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

पुणे येथे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. या मोर्चात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, घडलेली घटना अत्यंत निंदनीय, तसेच गंभीर असून याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. सरकारने या घटनेशी संबंधित सर्वांचे राजीनामे घेतले पाहिजेत. यामध्ये कोणीही उच्च पदस्थ असल्यास त्याच्यावर सुद्धा कारवाई करणे सरकारचे कर्तव्यच आहे. अशा घटनांमुळे राज्यामध्ये गुंतवणूकदार येण्याचे प्रमाण थांबेल. उद्योगासाठी राज्यात पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. अन्यथा, आपला महाराष्ट्र कधी मागे पडेल, हे कळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी या गंभीर घटनांकडे तातडीने पावले उचलून अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे. त्यांचे हे एकप्रकारे अपयशच आहे. उच्चपदस्थांचे त्वरीत राजीनामे घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणीही श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

ते म्हणाले, सध्या परळीमध्ये नेमकं काय चालतं, ते सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, तसेच तेथील लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे. दमानिया यांनी महाराष्ट्रातील अनेक गैरव्यवहार समोर आणले आहेत. त्यांच्या जीवाला धोका असून त्यांना धमक्या येत आहेत. सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी जर अन्यायाला वाचा फोडत असतील, तर सरकारने राज्यातील कायदा, सुव्यवस्थाची काळजी घेतली पाहिजे. एखाद्याची निघृण हत्या करणं, हा मानवतेचा मुद्दा आहे. दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी घडलेल्या घटनांचे गांभीर्य बाळगून जबाबदारी स्वीकारत कडक कारवाई केली पाहिजे. या घटनांमागे जो मंत्री किंवा उच्च पदस्थ असतील, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच घडलेली घटना कोणाच्या आदेशाने किंवा राजाश्रयाने झाली, हे महाराष्ट्रातील जनतेला समजले असून याबाबत तथ्यता सरकारने समोर आणून देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा.

Related Articles