सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येईल – आमदार पृथ्वीराज चव्हाण
वाठार भागातील प्रचार दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद
42 1 minute read

कराड/प्रतिनिधी : – लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोके सरकारचा जनतेने पराभव केला. याचीच पुनरावृत्ती आता विधानसभा निवडणुकीतही होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कराड दक्षिणेचा विकास पुन्हा त्याच जोमाने होईल, असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जुने मालखेड, मालखेड, रेठरे खुर्द, वाठार, आटके येथे महाविकास आघाडीच्या प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे सेवा दलाचे कराड दक्षिणचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, अॅड नरेंद्र नांगरे – पाटील, युवा नेते इंद्रजित चव्हाण, दिग्विजय पाटील, संजय तडाखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड तालुक्यातील जनतेने संधी दिल्यामुळे माझ्या राजकीय सुरुवात झाली. जनतेच्या विश्वासामुळेच मला केंद्रीय मंत्री, तसेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. कराड नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतल्यापासून ते अमेरिकेत इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर आई – वडिलांचे संस्कार समाजसेवेचे असल्यामुळे राजकारणात प्रवेश करून समाजसेवेचे वृत्त हाती घेतले. त्या माध्यमातून आजपर्यंत मिळालेल्या सत्तेचा उपयोग व्यक्तिगत प्रगतीपेक्षा सार्वजनिक व सामाजिक प्रगती साधण्यावर भर दिला. त्यामुळेच आजच्या डोलायमान राजकीय परिस्थितीतही आपण ताठ मानेने, सन्मानाने राहत असल्याचे मतही मतही त्यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, आ. कराड दक्षिणमध्ये कोट्यवधीची विकासकामे केली आहेत. गेली साडे – सात वर्षे भाजपचे सरकार असल्याने मतदारसंघात विकास निधी आणण्यात अनेक अडथळे आले. पण तरीही अडीच वर्षांच्या सत्ता काळात आणि प्रशासनातील कामकाजाची माहिती म्हणून कोट्यावधींचा निधी पुन्हा एकदा कराड दक्षिणसाठी आणता आला.
आ. चव्हाण म्हणाले, कृष्णाकाठी विकासाच्या योजना काँग्रेसमुळे उभ्या राहिल्या. तुम्ही केवळ आमदार निवडत नाही. तर सरकार निवडायचे, हे ठरवणारी निवडणूक आहे. फुले, शाहू व आंबेडकर यांच्या विचारांचे सरकार आणायचे की, पुन्हा वर्ण व्यवस्था आणणाऱ्या प्रवृत्तींना आपण बळ द्यायचे, हे मतदारांनी ठरवावे.
रविकिरण पाटील म्हणाले, डॉ. अतुल भोसले यांच्या गटाकडे आश्वासनांचा पाऊस आणि एका बाजूला पृथ्वीराज बाबांचा खरा विकास दिसत आहे. मालखेड येथील बैठकीत बोलताना ते म्हणाले, विरोधक फसवी आश्वासने देत आहेत. अतुल भोसले यांनी मालखेड गावात येवून केलेल्या भूमिपूजनाचे काय झाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
42 1 minute read