सातारा जिल्हाहोम

सेवानिवृत्ती म्हणजे जीवनाचा नवा अध्याय – जयंत आसगावकर

भरत बुरुंगले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार

कराड/प्रतिनिधी : –

सेवानिवृत्ती म्हणजे जीवनाचा शेवट नसून, जीवनाचा नवा अध्याय आहे. रिटायर म्हणजे टायर बदलले आहेत, त्यांच्या कर्तुत्वाची गाडी आता अधिक वेगाने धावली पाहिजे, असे मिश्कील मत शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केले.

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या मलकापूर येथील आनंदराव चव्हाण विद्यालयाचे पर्यवेक्षक भरत बुरुंगले ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सातारा जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी अनीस नायकवाडी होते.

अनिस नायकवडी म्हणाले, सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला आनंदाचा आणि दुःखाचा असे दोन किनारे असतात. शिक्षक आपल्या ज्ञानार्जनातून अनेक पिढ्या घडवितात. अशावेळी ते आपल्या परिवारास, नातेवाईकांना न्याय देऊ शकत नाहीत. परंतु, सेवानिवृत्तीनंतर या सर्वांना न्याय देण्यास मिळणारा वेळ हा बुरुंगले सरांसाठी आनंदाचा किनारा आहे. तर शाळा हेच घर मानून अहोरात्र शाळेचा विचार करणारे शिक्षक म्हणून त्यांना सेवेतून निवृत्ती मिळाली, हा त्यांच्यासाठी दुःखाचा किनारा. ज्यांची कर्तुत्वाची पाने भरतात, त्यांच्या वाट्याला हा सोहळा येतो.

अशोकराव थोरात बुरुंगले सरांना शुभेच्छा देताना म्हणाले, सरांनी नेहमीच संस्थेचा आदर करून, शाळेसाठी जास्त वेळ देत आपल्या पदाला न्याय दिला. त्यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचा चंगच बांधला होता. त्यांचे विद्यार्थी सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर, उच्च पदस्थ आहेत. सरांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांना जीवनाचेही धडे दिले.

विद्यालयातील विद्यार्थी प्रसाद कोराळे याने सरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर त्यांचे मित्र, नातेवाईक, शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांतील शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी, मान्यवर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या

सत्काराला उत्तर देताना भरत बुरुंगले म्हणाले, ज्याची सुरुवात चांगली, त्याचा शेवट चांगला. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल केली पाहिजे. प्रयत्नाशिवाय काही साध्य होत नाही, कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही. त्यासाठी अचूक संधी शोधून त्याचे सोने केले पाहिजे, असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एस.डी. खंडागळे यांनी, तर उपमुख्याध्यापक ए.बी. थोरात यांनी आभार मानले.

Related Articles