आ. मनोज घोरपडे यांनी पुन्हा गाजवली विधानसभा

कराड/प्रतिनिधी : –
कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे हे पावसाळी अधिवेशनासाठी आपल्या कुटुंबासह विधानभवनामध्ये दाखल झाले होते. यावेळी कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांनी आपलं कर्तव्य बजावत पुन्हा एकदा विधानसभा गाजवत कराड उत्तरमधील प्रलंबित प्रश्नांबाबत आग्रही भूमिका मांडली.
आ. घोरपडे म्हणाले, महाराष्ट्र राज्याला वारकऱ्यांची फार मोठी परंपरा आहे. आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक हजारो पालख्यांसह पंढरपूरला चालत जात असतात. परंतु, काही मोजक्याच दिंड्यांना मानाचे स्थान दिले जाते. अशातच वडगाव जयराम स्वामी येथील मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांची पालखी पंढरपूरला जात असते. या पालखीला 135 वर्षांची परंपरा आहे. परंतु, त्याची नोंद मानाच्या पालख्यांमध्ये नाही. या पालखीस शेकडो वर्षांची परंपरा असल्यामुळे या पालखीस मानाच्या पालखीत स्थान घ्यावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.
याचबरोबर शेतकऱ्यांना सोलर कृषीपंप योजना चालू आहे. परंतु, सर्व शेतकरी ह्या योजनाचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे मोटारीचे हेड जास्त आहे, ज्या शेतकऱ्यांची नदीकाठी मोटर आहे, किंवा जे शेतकरी कॅनलवर मोटर बसवतात. अशा शेतकऱ्यांना सोलर पॅनल बसवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यांना त्यांच्या गरजेनुसार विद्युत कनेक्शन मिळावे, अशी आग्रही भूमिका आ. घोरपडे यांनी मांडली. तसेच मसूर येथील पोलीस स्टेशनला नवीन इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा, तसेच रहिमतपूर नगरपालिकेला वैशिष्ट्य पूर्ण निधीमधून पाच कोटींचा निधी वापरण्यास परवानगी मिळावी, अशी ही मागणी त्यांनी विधानसभेत केली.