तासवडेच्या सरपंच दीपाली जाधव यांच्या मानधनातून वेळेवर कर भरणाऱ्या ग्रामस्थांना बक्षीस वितरण

कराड/प्रतिनिधी : –
ग्रामविकास आणि लोकसहभाग याला प्रोत्साहन देणारा एक आगळा-वेगळा उपक्रम तासवडे ग्रामपंचायतीत सरपंच सौ. दिपाली अमित जाधव यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला. त्यांच्या वैयक्तिक सरपंच मानधनातून वेळेवर कर भरून जबाबदार नागरिकत्व निभावणाऱ्या ग्रामस्थांचा सन्मान करण्यासाठी खास लकी ड्रॉ व बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) मा. प्रताप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी २० भाग्यवान करदात्यांना 20 हजार रुपयांची बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास पंचायत समितीचे अधिकारी माळी, तासवडेच्या सरपंच सौ. दिपाली जाधव, तळबीडच्या सरपंच सौ. मृणालिनी मोहिते, माजी सरपंच संग्राम पवार, उमेश मोहिते, उपसरपंच सौ. मनीषा जाधव, ग्रा.प. सदस्य सुभाष जाधव, सौ. भारती शिंदे, सौ. लता जाधव, शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित जाधव, ग्रामसेवक महादेव जाधव, कृष्णा देशमुख व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच हे गावच्या सेवेचे पद असून यामधून गावची सेवा व्हावी, तसेच नवनवीन योजना राबवाव्यात या हेतूने शासनाकडून सरपंचांना मिळणारा पगार स्वतःसाठी न वापरता तो पगार गावच्या विकासासाठी, तसेच विविध योजनांसाठीच वापरण्याचे सरपंच दिपाली जाधव यांनी ठरवले आहे. गावातील ग्रामस्थांनी वेळेवर कर भरला तरच, गावामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे व योजना राबवण्यात येऊ शकतात. तासवडे गावातील बहुतांशी ग्रामस्थ वेळेवर कर भरत असतात. त्यांना प्रेरणा मिळावी आणि इतर थकबाकीदार यांनाही कर भरणा करण्यास प्रेरणा मिळावी, या हेतूने 31 मार्च 2025 अखेरचा संपूर्ण घरफळा, पाणीपट्टी व इतर कर येणे बाकी नसलेल्या सुमारे 270 मिळकतदारामधून हा लकी ड्रॉ काढण्यात आला. तासवडे गावामध्ये नेहमीच नावीन्यपूर्ण व पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात असतात.गावला “स्मार्ट ग्राम” व “संत तुकडोजी महाराज ग्राम स्वछता पुरस्कार” सुद्धा मागील 2 वर्षाला मिळाला असून याद्वारे 13 लक्ष 50 हजार एवढ्या रकमेचे पारितोषिकही मिळाले आहे.
गेल्या 4 वर्षांत विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून 1 कोटी 61 लक्ष रुपयांची कामे पूर्ण झाली असून 15 वित्त आयोग व स्वनिधिमधूनही 50 ते 60 लक्ष रुपयांची विकासकामे झाली आहेत. तासवडे ग्रामपंचायतीने केंद्र शासनाच्या सौर ऊर्जा धोरण व राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सूचनेला अनुसरून ग्रामविकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत ‘कराड मोटर्स अँड प्रोजेक्ट्स (किर्लोस्कर)’ उद्योग समूहाच्या सहकार्याने 3 KW क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पामधून दररोज अंदाजे १२ युनिट वीज निर्माण होणार असून महिन्याकाठी सुमारे २,००० रुपयांची वीज बचत ग्रामपंचायतीस होणार आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाचा पारदर्शक आणि विकासाभिमुख दृष्टिकोन या उपक्रमांतून अधोरेखित झाला. सरपंच सौ. दिपाली जाधव यांच्या या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे ग्रामस्थांनी संतु कौतुक केले आहे. हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.
यावेळी कार्यक्रमास लक्ष्मण जाधव, युवराज जाधव, विकास जाधव, बाळासो जाधव, राजेंद्र जाधव, पांडुरंग शिंदे, संग्राम जाधव, संदीप जाधव, भगवान शिंदे, रामचंद्र जाधव, शंकर जाधव, सुनील जाधव, अभिजीत जाधव, विश्वास जाधव, शहाजी जाधव आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच दिपाली जाधव यांचे स्मार्ट व्हिजन!
तासवडेकर करदात्यांचा गौरव आणि स्वयंपूर्णतेसाठी सौरऊर्जेचं यशस्वी पाऊल, करदात्यांना बक्षीसे आणि ग्रामपंचायतीला सौर शक्तीची भेट, लकी ड्रॉ, रोख बक्षीसे आणि सौरऊर्जेचा तेजस्वी प्रारंभ