सातारा जिल्हाहोम

पाटण मतदारसंघाच्या विकासासाठी भाजप प्रवेशाचा निर्णय – सत्यजितसिंह पाटणकर 

कराड/प्रतिनिधी : –

भाजप हा देशातीलच नव्हे; तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपच्या माध्यमातूनच पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न व विकासकामे मार्गी लागण्याचा विश्वास वाटल्यानेच पक्षाच्या नेत्यांकडे कोणत्याही अटी शर्ती न ठेवता आम्ही भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला असल्याचे मत सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केले.

मुंबई येथे नुकताच भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर पाटण तालुक्यातील युवा नेते, माजी पंचायत समिती सभापती सत्यजितसिंह पाटणकर यांनी बुधवारी येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी ज्येष्ठ नेते हिंदुराव पाटील, पाटणचे माजी सभापती राजाभाऊ शेलार, माजी उपसभापती रमेश मोरे, पाटण अर्बन बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब राजेमहाडिक, आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

माध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बोलताना श्री. पाटणकर म्हणाले, मी व माझ्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर सर्व गोष्टी घातल्या आहेत. त्यामुळे मुंबई येथील आमच्या पक्षप्रवेशाला भाजपचे मोठे नेते नव्हते, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होणारी टीका पूर्णपणे चुकीची असल्याचे सांगत ते म्हणाले, आमच्या पक्षप्रवेशावेळी पाटण तालुक्यातील सर्वसामान्य जनता, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खुद्द छत्रपती आमच्या बरोबर होते, यापेक्षा आम्हाला आणखी काय पाहिजे. पक्ष बदलत असताना आम्ही वेगळ्या वाटेने किंवा सुरत मार्गे गुवाहाटीला गेलो नाही, असे टीकास्त्रही सत्यजितसिंह पाटणकर यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर सोडले.

तसेच पाटण मतदारसंघात महायुतीचेच आमदार आणि मंत्री आहेत. त्यामुळे आगामी काळात आपण तालुक्यात एकत्रित काम करणार का? या प्रश्नावर बोलताना श्री. पाटणकर म्हणाले, आपण आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केल्यामुळे पक्षाचे विचार तळागाळात पोहाचावाण्यास आमचे पहिले प्राधान्य राहणार आहे. आगामी काळात पक्ष व पक्षाचे वरिष्ठ नेते जो आदेश देतील, त्याप्रमाणे आम्ही काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत बोलताना श्री. पाटणकर म्हणाले, २५० गावे या प्रकल्पात घेतली आहेत. या गावांत ‘एमएसआरडीसी’ने टाकलेले आरक्षण कोणते आहे? हेही स्थानिकांना माहीत नाही. त्यामुळे भाजपच्या माध्यमातून हा प्रश्न ऐरणीवर आणून तो सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच व्याघ्र प्रकल्प झाला पाहिजे. परंतु, त्यासोबत तेथील स्थानिक माणूसही जगला पाहिजेत आणि शेतीही वाचली पाहिजे, ही आपली भूमिका असून यासाठी भाजपाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles