सातारा जिल्हाहोम

मलकापूर नगरपालिकेने थकीत घरपट्टीवरील शास्ती सवलत द्यावी

शिवसेनेची मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

कराड/प्रतिनिधी : –

महाराष्ट्र शासनाने घरपट्टीसारख्या मालमत्ता कराच्या थकीत रकमेवरील दरमहा २ टक्के शास्ती (व्याज) सवलत देण्यासाठी ‘अभय योजना २०२५’ लागू केली आहे. या योजनेअंतर्गत सातारा नगरपालिकेकडून करदात्यांना मोठा दिलासा देत ५० टक्क्यांपेक्षा अधिक शास्ती सवलतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्याच धर्तीवर मलकापूर पालिकेने हद्दीतील करदात्यांनाही दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिवसेनेचे शहरप्रमुख मधुकर शेलार, उपशहरप्रमुख निलेश सुर्वे, शाखाप्रमुख नरेंद्र लोहार, विभागप्रमुख संतोष वाघमारे आणि ओमकार काशीद पाटील यांच्यासह उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, “अनेक मध्यमवर्गीय व सर्वसामान्य नागरिक आर्थिक विवंचनेत सापडले असून त्यांना थकीत कर भरणे कठीण जात आहे. अशा नागरिकांना अभय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मलकापूर नगरपरिषदेकडूनही तातडीने योजना राबवावी.”

सदर योजनेमुळे पालिकेच्या करसंकलनात वाढ होणार असून शासन निर्णयाच्या अनुषंगाने नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे, असा विश्वास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles