शेतकऱ्यांनी केलेला सत्कार म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद – दत्तात्रेय खरात
मलकापूर येथे माजी कृषी अधिकारी दत्तात्रेय खरात यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

कराड/प्रतिनिधी : –
“शेतकऱ्यांनी केलेला सत्कार म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद आहे. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, शेतीवर आधारितच सेवा व उद्योग व्यवस्थाही चालते. त्यामुळे शेतीचे महत्व सर्वांनी ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन माजी तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय खरात यांनी व्यक्त केले.
कराड तालुक्यातील माजी कृषी अधिकारी दत्तात्रेय खरात यांचा सेवापूर्ती समारंभ मलकापूर येथील आदर्श ज्युनिअर कॉलेजमध्ये उत्साहात पार पडला. मळाई ग्रुप, लक्ष्मी देवी शेतकरी मंडळ मलकापूर, यशवंत फळे-फुले-भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी संस्था मर्या. कराड, तसेच विज्ञान प्रबोधिनी, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावारू बोलताना शेतीमित्र अशोकभाऊ थोरात यांनी शेतीविषयक सरकारी अनास्था व चुकीच्या धोरणांवर तीव्र शब्दात टीका केली. ते म्हणाले, “भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेती असून, शासनाने शेतकऱ्यांसाठी ठोस धोरणं, कायदे आणि उद्दिष्टं ठरवणे गरजेचे आहे. कृषी अधिकारी व कर्मचारी यांनी फक्त कागद रंगवू नये, तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन करावे.
कार्यक्रमास तालुक्यातील नामवंत शेतकरी, कृषी अधिकारी सुनील ताकटे, शेखर शिर्के, तसेच विज्ञान प्रबोधिनीचे सर्व संचालक उपस्थित होते. प्रास्ताविक आदर्श ज्युनिअर कॉलेजच्या विभागप्रमुख सौ. शीला पाटील, सूत्रसंचालन सौ. खंडागळे मॅडम, प्राचार्या सौ. अरुणा कुंभार यांनी आभार मानले.