कराडला महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा – आमदार डॉ. अतुलबाबा भोसले
नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला दिली भेट

कराड/प्रतिनिधी : –
गेल्या अनेक वर्षांपासून पुणे-बंगळुरु आशियाई महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामाअंतर्गत कराड शहरालगत सहापदरी उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र या कामाच्या दिरंगामुळे कराड परिसरातील महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून, परिणामी अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. काही घटनांमध्ये दुर्दैवाने जीवितहानीदेखील झाली आहे. याची गंभीर दखल घेत, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी थेट नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला भेट देत, अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आग्रही मागणी केली.
पुणे – बंगळुरू महामार्ग हा राष्ट्रीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा दळणवळण मार्ग असून, यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवणे ही केवळ स्थानिक नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षिततेशी संबंधित बाब आहे. पण हे काम संथगतीने सुरू असून, या मार्गावर सातत्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन, गंभीर अपघाताचे प्रकार घडत आहेत. याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
याची गंभीर दखल घेत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल पाटील यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले. महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरु असणे हे स्वागतार्ह असले, तरी त्याचबरोबर अपघातांचे प्रमाण वाढणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांच्या जिविताचा प्रश्न असल्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे महामार्ग रस्ते कामातील आणि उड्डाणपूल उभारणीच्या कामातील दिरंगाई दूर करण्यासाठी तातडीने उपाय योजण्याची मागणी त्यांनी केली. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी अधिक कर्मचारी, योग्य दिशादर्शक फलक, अपघात टाळण्यासाठी स्पीड ब्रेकर आणि पथदिवे आदींची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी श्री. पाटील यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसह डी. पी. जैन समूहातील अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधून सूचना दिल्या. तसेच सर्व संबंधितांची केंद्रीय मंत्री ना. गडकरी यांच्यासमवेत तात्काळ बैठक आयोजित करण्याची ग्वाही श्री. पाटील यांनी आ.डॉ. भोसले यांना दिली.