सातारा जिल्हाहोम

रेल्वे मार्ग दुहेरीकरणात शेतकऱ्यांवर अन्याय नाही – आ. मनोज घोरपडे

कराड/प्रतिनिधी : –

कोरेगाव तालुक्यात पुणे-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये एकाही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. भूसंपादन असो अथवा नुकसान भरपाईचा विषय, शासन निश्चितपणे शेतकऱ्यांना मदत करणार आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे, अशी ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.

कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये शनिवारी दुपारी रेल्वे मार्ग दुहेरीकरणाविषयी महत्त्वपूर्ण बैठक आमदार घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, मध्य रेल्वेचे सीनियर सेक्शन इंजिनिअर जितेंद्र कुमार, रेल्वे भूसंपादन लढ्याचे प्रवर्तक विकास थोरात यांच्यासह मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील उपस्थित होते.

गोडसेवाडी, दुधी, सासुर्वे, धामणेर, नेहरवाडी, टकले, बोरगाव, किरोली, तारगाव, नलावडेवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. गावनिहाय आणि जमिनीच्या गटनिहाय शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. प्रांताधिकारी नाईक यांनी याबाबत माहिती दिली. जितेंद्र कुमार यांनी रेल्वे प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले. यावेळी रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबरोबरच एकाही शेतकऱ्याला अडचण येऊ नये, या दृष्टीने प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

सर्वसामान्य लोकांच्या अडचणीचा निपटारा

आमदार मनोजदादा घोरपडे यांच्याकडून सातत्याने विभागवार आढावा बैठका व जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या अडचणीचा निपटारा सहज होत आहे.

Related Articles