सातारा जिल्हाहोम

छत्रपती संभीजनगर येथून सरकारविरोधी आंदोलनाचा श्रीगणेशा करणार – भानुदास माळी 

कराड/प्रतिनिधी : –

केंद्र सरकारने केलेली जातनिहाय जनगणनेची घोषणा राहुल गांधी यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे शक्य झाली आहे. परंतु, जातनिहाय जनगणनेबाबत केंद्र सरकारकडून अद्याप स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाहीत. राहुल गांधींमुळेच जातनिहाय जनगणनना होणार असल्याने जुन महिन्यात छत्रपती संभीजनगर येथे त्यांचा सत्कार करुन सरकारविरोधी आंदोलनाचा श्रीगणेशा केला जाणार असल्याची माहिती कॉंग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात सदर आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, विभक्त जाती भटक्या जमाती जिल्हाध्यक्ष आनंदराव जाधव, ओबीसी माळी महासंघाचे राज्य अध्यक्ष संजय माळी, ओबीसी कराड उत्तर अध्यक्ष दत्तात्रय काशीद अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष रामभाऊ पवार उपस्थित होते.

श्री. माळी म्हणाले, जातनिहाय जनगणनेची केंद्र शासनाने घोषणा केली असली, तरीसुद्धा त्यात अनेक गोष्टींची अस्पष्टता आहे. त्यामुळे ही जनगणना होईल की नाही? यावर ओबीसी काँग्रेस सेलमध्ये शंका आहे. जनगणना कोणत्या एजन्सीमार्फत करणार, त्यात कोणत्या जातींना समाविष्ट करणार हे केंद्राने अद्याप स्पष्ट केलेले नाही. त्यासाठी विविध अधिवेशन बोलवणे गरजेचे आहे. परंतु, अद्याप त्याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. त्या घेण्याबाबतचे आदेश सर्वोच्य न्यायालयाने सरकारला दिले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या निवडणुका त्वरित घोषित करून त्या बॅलेट पेपरवर घ्याव्यात. केंद्रीय वित्त आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना सहा वर्षे निधी मिळालेला नाही. ओबीसी समाजात अनेक घटकांसाठी विविध महामंडळे घोषित केली, परंतु कोणत्याही महामंडळासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग, स्वतंत्र कार्यालय, विशेष आर्थिक तरतूद केलेली नाही. त्यामुळे ओबीसी समाजातील घटकांची ही निव्वळ फसवणूक आहे. प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी वसतीगृहे उभारण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने ओबीसी विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी झाली आहे. सरकारने सातत्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली, ती पूर्णपणे फेल झाली आहे. मध्य प्रदेशच्या दोन्ही मंत्र्यांनी देशाची कर्नल सोफीया कुरेशी आणि सैनिकांबद्दल काढलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असताना सुद्धा सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाही. ‘वन नेशन वन इलेक्शन’ ही संकल्पना अत्यंत चुकीची असून, देशाच्या दृष्टीने ती अत्यंत धोकादायक आहे. याला ओबीसी काँग्रेसचा पूर्णपणे विरोध आहे. देशाचे संविधान पूर्णपणे धोक्यात आले आहे. जातिनिहाय जनगणनेसाठी राहुल गांधी यांचा नागरी सत्कार ओबीसी विभागामार्फत छत्रपती संभाजीनगर येथे जून २०२५ मध्ये सुमारे एक लाख लोकांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची पूर्वतयारी २५ मे रोजी पिंपरी चिंचवड येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी एका प्रश्नावर बोलताना श्री. माळी म्हणाले, छगन भुजबळ यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला. ओबीसीचे नेते म्हणून आम्ही त्यांचे स्वागत करतो. मात्र, मंत्रीमंडळात कॉंग्रेसमधीलच अनेकजणांचा समावेश आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, त्यातील अनेकजण भाजपसोबत गेलेत. सरकारमधील अनेक मंत्र्यांवर, खासदार, आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असतानाही ते सत्तेत आहेत, याकडे लक्ष वेधत भानुदास माळी यांनी भाजपवर निशाणा साधला.

Related Articles