थकबाकीदारांनीच यशवंत बँक अडचणीत आणली चेअरमन महेश जाधव
खोट्या प्रचाराला बळी न पडता ठेवीदारांनी बँक प्रशासनावर विश्वास ठेवावा

कराड/प्रतिनिधी : –
यशवंत बॅंकेच्या विरोधात ठेवीदारांनी तक्रार केली, तर काहीही वाटणार नाही. मात्र, बँकेच्या कर्जदारांनीच त्यांची कर्जे थकली असून तेच आज बँकेविरोधात तक्रारी करत आहेत. प्रसारमाध्यमांद्वारे बँकेची बदनामी करत आहेत. यामुळेच यशवंत बँक अडचणीत आली आहे. मात्र, ठेवीदारांनी अशा खोट्या प्रचाराला बळी न पडता बँक प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन बॅंकेचे चेअरमन महेश जाधव यांनी केले.
बँकेची सद्यस्थिती व काही कर्जदारांकडून केल्या जाणाऱ्या बदनामीसंदर्भात भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. जाधव म्हणाले, कर्ज थकीत असणारे सर्वजण बँक बुडावी म्हणून प्रयत्न करत आहे. या उद्देशानेच ते केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गेले. त्यांनतर सहकार विभागाकडून त्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये कर्जदारांनी घेतलेले कर्ज बरोबर असल्याचा अहवालही त्यांनी दिला. काही चुका झालेल्या आहेत. मात्र, कर्जचं वाटप झालेले नाहीत, असे नाही. संबंधित कर्जदारांनी प्रसारमाध्यमांकडे जाऊन चुकीची माहिती दिली आणि तशा बातम्या आल्यामुळे बॅंकेच्या कर्ज वसुलीवर परिणाम झाला आहे. बँकेने वसुलीचा तगादा लावल्यामुळे असे प्रकार कर्जदारांनी केले, याचा परिणाम ठेवीवर झाला. ठेवीदारांनी याचा विचार करावा. चुकीचा हेतु ठेवून बँकेला बदनाम करण्याचे काम करणाऱ्यांना शासन व्हावे. पत्रकार परिषदा घेणाऱ्यांच्या हेतूबद्दलच शंका असल्याचे मग व्यक्त करत या हेतूचा त्यांनी खुलासा करावा. खासदार मेघा कुलकर्णी यांनी कर्जदारांना पाठीशी घालू नये, वस्तुस्थिती जाणून घेऊन बँकेस सहकार्य करावे.
ते पुढे म्हणाले, शेखर चरेगावकर हे दुसऱ्या एका बॅंकेचे थकबाकीदार असल्याची माहिती काही कर्जदारांना कळाली. याबाबत त्यांनी आय़ुक्तांकडे तक्रार केली. त्यावर आयुक्तांनी श्री. चरेगावकर यांना यशवंत बॅंकेच्या अध्यक्षपदावरुन दुर केले. त्या निर्णयावर सध्या स्थगीती आदेश आहे. मात्र, त्यासंदर्भातील बातम्या माध्यमांत आल्याने अनेक ठेवीदारांनी ठेवी काढण्यास सुरुवात केली. मागील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात ६०-६५ कोटींच्या ठेवी ठेवीदारांनी काढल्या. त्यावेळी बॅंकेकडून ठेवीदारांना थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे बॅंकेचे सर्व पैसे संपल्यानंतर जास्त दंगा व्हायला लागला. आम्ही लोकांना तोंड देवून माहिती दिली. मात्र, त्यादरम्यान वसुलीकडे दुर्लक्ष झाले, ही वस्तुस्थिती आहे.
तसेच यशवंत बॅंकेबाबत खासदार मेधा कुलकर्णी यांनी अमित शहा यांच्याकडे २०२४ मध्ये तक्रार केली होती. त्यानंतर उपनिबंधकांनी बॅंकेची तपासणी केली. खरच बोगस कर्जदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यास आमची तक्रार नाही. मात्र, माध्यमांकडे जाण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित करुन श्री. जाधव म्हणाले, तक्रारदारांनी अजुनही सर्वोच्य न्यायालयात जाण्यास आमची हरकत नाही. मात्र, दंगा व्हावा, ठेवीदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण व्हावे आणि बॅंक बंद पडावी, हा त्यांचा हेतू दिसत आहे. बॅंक बंद पडल्यावर कर्जदारांचा फायदा होणार आहे. त्यामुळे ठेवीदारांनी याचा विचार करावा. चुकीचा हेतू ठेवून काम करत आहेत, त्यांना शासन व्हावे. मला पत्रकार परिषदा घेणाऱ्यांच्या हेतूबद्दलच शंका आहे. या हेतूचा त्यांनी खुलासा करावा. खा. कुलकर्णी यांनी कर्जदारांना पाठीशी घालू नये, असेही आवाहनही चेअरमन श्री. जाधव यांनी यावेळी केले.
ते म्हणाले, मी बॅंकेचा अध्यक्ष झाल्यानंतर संचालक मंडळाने कर्जवसुली कडक करण्यासाठी मोहिम हाती घेतली. वसुलीसाठी सर्व प्रकरणे कर्जदारांच्या सिबीलला अपलोड केली. त्यामुळे अनेकांना अडचणी झाल्या. त्यानंतर १०१ ची प्रकरणे सुरु केली. काही लिलावाच्या प्रक्रीयेत आहेत. मी चेअरमन झालो, त्यादिवशी १९७ कोटी रुपयांचे कर्ज होते, ते आज १४४ कोटी १५ लाख आहे. १८४ कोटी ठेवी होत्या त्या सध्या १४४ कोटी ७२ लाख रुपये राहिल्या आहेत. सर्व कर्जे वसुल करुन ठेवीदारांचे पै-पै परत देण्यास आम्ही बांधील आहे. राजकारण बाजुला ठेवून असंख्य लोकांनी आम्हाला मदत केली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत बॅंक ऊर्जितावस्थेत येईल. त्यासाठी आमची कार्यवाही सुरु आहे. रिझर्व्ह बॅंकेने ज्या कर्जदारांची कर्ज भरण्याची परिस्थिती आहे; मात्र ते भरत नाहीत, त्यांना वीलफुल डीफॉल्टर जाहीर करण्याचा सल्ला दिला आहे. ३५ ते ४० कोटींच्या ठेवींचे ठेवीदारांनी नुतनीकरण केले आहे. संस्थेच्या ४० कोटींच्या ठेवी आहेत. त्या ठेवींचे व्याज सध्या दिले जात आहे.
तसेच बँकेचे कर्ज येणे १४४ कोटी, व्याज येणे सुमारे ८० कोटी आणि बॅकेच्या नावावर केलेल्या मालमत्ता सात कोटी रुपयांच्या आहेत. असे २२५ कोटी बॅंकेचे येणे आहे. ते ठेवीदारांच्या ठेवी देण्यापेक्षा जादा आहे. त्यामुळे आम्ही ठेवीदारांना भरोसा देवू शकतो. कोयना बॅंकेचे संस्थापक अॅड. उदयसिंह पाटील यांनी आम्हाला आधार दिला. त्यांनी गरज पडल्यास कोयना बॅंकेत यशवंत बॅंक विलीनीकरण करण्याचे आश्वासन दिले. मात्र, सध्या विलीनीकरणाची बॅंकेवर वेळ येणार नाही, असा विश्वासही चेअरमन जाधव यांनी व्यक्त केला.