यशवंत बँकेच्या कर्जबुडव्यांनी न्यायालय दाद मागावी – शेखर चरेगावकर

कराड/प्रतिनिधी : –
यशवंत बँकेचे कर्जबुडवेच डोळ्यात ‘मगरमछ के आसू’ डोळ्यात आणत ती विचारांची दिशाभूल करून माझ्यावर खोटे आरोप करत आहेत. खोटी कर्ज प्रकरणे आणि बोगस संस्था दाखवून यशवंत बँकेत घोटाळा केल्याचे ती म्हणत आहेत. असे असेल तर त्यांनी न्यायालयात दाद मागावी. पुरावे सादर करावेत. ठेवीदारांनीही यांनी पसरवलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. मी कोणालाही घाबरत नाही, असे ठाम मत बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केले.
यशवंत बँकेचे कर्ज बुडवलेले संजय कुलकर्णी यांनी बँकेचे माजी अध्यक्ष चरेगावकर यांच्यावर घोटाळा केल्याचे आरोप केले होते. त्यांच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी श्री. चरेगावकर म्हणाले, संजय कुलकर्णी हेच बँकेचे कर्जबुडवे आहेत. त्यांनी आणखी काही कर्जबुडव्यांना सोबत घेऊन हा खटाटोप सुरू केला आहे. त्यांनी अनेक ठिकाणी केलेल्या तक्रारींचे निकाल त्यांच्याच विरोधात गेल्याने खासदारांकरवी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना निवेदन दिले असून ते बँकेची सीबीआय चौकशी होणार असल्याचे सांगत आहेत.
ते म्हणाले, संजय कुलकर्णी यांनी यशवंत बँकेचे घेतलेले कर्ज थकल्यामुळे बँकेने त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या. त्याची लिलाव प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे ते आता असले उद्योग करत सुटले आहेत. त्यांनी यापूर्वीही आरोप केल्याने बँक अडचणीत आली आहे. बँकेच्या कर्जदारांनी पैसे भरल्यामुळे २१८ कोटींवरुन ठेवी १४० कोटींवर आल्या असून ७० कोटी रुपये ठेवीदारांचे परत केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमच्यावर आरोप करणाऱ्यांची एक रुपयाचीही ठेव बॅंकेत नाही. व्यवहार करताना काही तांत्रीक दोष राहिले असतील; त्याला धरुन तुम्ही आरोप करत असाल तर, पहिल्यांदा त्यांनी स्वतःचे कर्ज भरावे, असेही त्यांनी यावेळी ठणकवले.