रुग्णांना आपल्या हक्काची सनद माहिती असावी – उमेश चव्हाण
माजी खा. स्व. प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने व्याख्यान

कराड/प्रतिनिधी : –
डॉक्टर हे हॉस्पिटलचे बांधील पद असून, धर्मादाय हॉस्पिटल अथवा चॅरिटेबल ट्रस्टचे चालक हेच महत्वाचे असतात. धर्मादाय हॉस्पिटल व चॅरिटेबल ट्रस्टचे दवाखाने गोरगरीब रुग्णांसाठी मोफत असतात. याची माहिती आपणास नसल्याने आपण अज्ञानपणाने त्या हॉस्पिटलच्या पिळवणूकीला बळी पडतो. याकरिता रुग्णांच्या हक्काची असणारी सनद आपल्याला माहिती असावी, असे मत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
येथील सौ. वेणूताई चव्हाण सभागृहात माजी खासदार (स्व.) प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्प सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे, तसेच रुग्णांचे हक्क व अधिकार या विषयांवरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, (ट्रस्टच्या सचिव सौ. गौरीताई चव्हाण, सौ. मंगल चव्हाण, अजितराव पाटील-चिखलीकर, भानुदास माळी, इंद्रजित चव्हाण, झाकीर पठाण, नामदेवराव पाटील, निवासराव थोरात, विद्याताई थोरवडे आदी उपस्थित होते.
उमेश चव्हाण म्हणाले, शालेय अभ्यासक्रमात आरोग्याचा विषय जागृतीसाठी आणणे महत्वाचे आहे. वैद्यकीय मदत कशी मिळवावी, हे अभ्यासक्रमात नसल्याची खंत वाटते. एखाद्याचे एक लाख साठ हजार रुपये वार्षिक उत्पन्न असेल, तर चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये पूर्ण बील माफ होते. व तीन लाख साठ हजार रुपये वार्षिक उत्पन्न असेल, तर निम्मे बील माफ होते. समाजसेवी व धर्मादाय संस्था ह्या समाजाच्या गरजेसाठी असतात. करोनाच्या संकटकाळात मदतीसाठी काढलेल्या संस्था व ट्रस्टने लोकांची लूट केली. रुग्णांचे हक्क व अधिकारांवर दररोज दरोडे पडत आहेत. याकरिता सर्वसामान्य लोकं जागृत झाली पाहिजेत.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराडकरांच्या मनात आरोग्याविषयी कुतूहल जागृत व्हावे. रुग्णांना दिलेले हक्क व अधिकार समजले पाहिजेत. नक्की व्यवस्थेत दोष आहे. परंतु, इंग्लंड व अमेरिकेमध्ये शंभर टक्के उपचार मोफत होतात. याच पद्धतीने आपल्या देशात शंभर टक्के उपचार शासकीय खर्चाने व्हावेत, त्यासाठी तरतूद झाली पाहिजे. विकसित राष्ट्र निर्माण करताना उपचार मोफत झाले पाहिजेत. केंद्र व राज्य सरकारचे आरोग्य आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे. देशाच्या एकूण उत्पन्नापैकी चार ते साडेचार टक्के तरतूद झाल्यास मोफत वैद्यकीय उपचार होतील. यासाठी आग्रह धरला पाहिजे.
प्रास्ताविकात सौ. गौरीताई चव्हाण यांनी माजी खासदार प्रेमलाताई चव्हाण यांच्या सेवाभावी विचासरणीच्या प्रेरणेने चॅरिटेबल ट्रस्टची निर्मिती झाली. या माध्यमातून गेल्या २१ वर्षांपासून समाज उपयोगी उपक्रम घेतले जात असल्याचे सांगितले. सचिन तडाखे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.