पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कराडच्या मुस्लिम बांधवांनी नोंदवला निषेध

कराड/प्रतिनिधी : –
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील घटना अमानवीय आणि निंदनीय असून भारताच्या एकतेला व शांततेला आव्हान देणारी आहे. या हल्ल्याचा कराड शहरातील मुस्लीम बांधवांनी तीव्र निषेध व्यक्त करीत दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कराड शहर मुस्लिम जमातीच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर मागणीचे निवेदन राष्ट्रपती यांच्या नावे कराड शहर मुस्लिम जमातीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, हारून तांबोळी, बरकत पटवेकर, रमजान कागदी, मन्सूर तांबोळी, साबीरमिया मुल्ला, अबुबकर शेख, कैस काजी, मजीद आंबेकरी, हाजी नदीम सुतार, हाजी मजहर कागदी, हाजी इरफान सय्यद, अहमद मोमीन उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, पहलगाम, जम्मू आणि काश्मीर येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण राष्ट्र हादरले आहे. या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांना, मुख्यतः पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. ही घटना केवळ अमानवीय आणि निंदनीयच नव्हे, तर भारताच्या एकतेला आणि शांततेला आव्हान देणारी आहे. या हल्ल्याचा आम्ही सर्व भारतीय कराड शहरातील मुस्लीम बांधव तीव्र निषेध व्यक्त करतो. या हल्ल्यात आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबियांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या दुखात आम्ही सहभागी आहोत आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. या दु:खद प्रसंगी संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भारत सरकारने या हल्ल्याच्या मुळाशी जाऊन, दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच सरकारने पाकिस्तानविरुद्ध ठोस पावले उचलून दहशतवादी तळ नष्ट करावेत, आंतरराष्ट्रीय दबाव वाढवून आवश्यक असल्यास लष्करी कारवाई करावी, अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.