आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्रहोम

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला  ३७ कोटी ३६ लाख नफा ; २११५ कोटीचा व्यवसाय

२०२६ पर्यंत २५०० कोटीचा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

चिपळूण / प्रतिनिधी : –

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने केवळ ३१ वर्षाच्या कार्यकाळात सर्व जनमाणसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली असून मार्च २०२५ अखेर संस्थेला व्यावसायिक नफा ३७ कोटी ३६ लाख झाला आहे तर संस्थेने २११५ कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  सुभाषराव चव्हाण व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.

संस्थेच्या वाटचालीबाबत माहिती देताना ते म्हणाले की, संस्थेची मार्च २०२५ अखेर सभासद संख्या १ लाख ४६ हजार ६८१, भाग भांडवल ७६ कोटी ५५ लाख तर एकूण स्वनिधी १६१ कोटी ७२ लाख आहे. फक्त ३१ वर्षाच्या कालखंडात सभासद संख्या व भाग भांडवल व स्वनिधी वाढीमध्ये राज्यातील काही निवडक संस्थामध्ये या संस्थेचा समावेश होतो. संस्थेच्या ठेवी ११३२ कोटी ११ लाख एकूण कर्जव्यवहार ९८२ कोटी ४८ लाख आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय २११५ कोटीचा असुन तो २०२६ पर्यंत २५०० कोटीचा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, भविष्यातील वाटचाली बाबत देखील यावेळी सांगितले. ते आणखी पुढे म्हणाले की, मागील आर्थिक वर्षाप्रमाणे यावर्षीही संस्थेने व्यवसाय वाढ करण्यात व नफा क्षमतेचे सातत्य राखले आहे. कोविडच्या काळात सुध्दा संस्थेने कामकाज अखंडपणे चालु ठेवत ग्राहकांना नियोजनबध्द, नम्र व जलदसेवा दिली आहे. शासनाने ठरवुन दिलेल्या आदर्श प्रमाणांचा त्यांचे अंमलबजावणीसाठी नियोजनबध्द प्रयत्न केल्यामुळे सर्वच आदर्श प्रमाणांच्या बाबतीत संस्थेने यशस्वीपणे काम केले आहे. संस्थेचा आर्थिक सक्षमतेचा पाया भक्कम आहे. संस्थेचे एकूण स्वनिधी १६२ कोटी असुन संस्थेने आपल्या आर्थिक सक्षमतेबरोबरच सामाजीक बांधीलकी जपण्यात यशस्वी झाली आहे. सभासदांच्या हिताला प्राधान्य देत असतानाच ठेवीदारांनाही त्यांच्या गुंतवणूकीवर जास्तीत जास्त मोबदला दिला जातो. गेली २६ वर्षे संस्था आपल्या सभासदांना त्यांच्या भागभांडवलावर १५ टक्के डिव्हीडंट देत आहे. संस्थेच्या आर्थिक सक्षमते बरोबरच संस्थेच्या सभासदांच्या हितासाठी प्रतिवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. सभासदांच्या मुलांना रोजगार व स्वयंरोजगार देण्यासाठी त्यांच्या व्यवसाय वृध्दीसाठी सुलभ पद्दतीने अर्थ पुरवठा करण्या बरोबरच त्यांना मार्गदर्शन करणेसाठी सातत्याने वेगवेगळया क्षेत्रातील तज्ञांची माहितीपर मार्गदर्शनपर व्याख्याने ठेवण्यात येत असतात. या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांना शेती पुरक जोडधंदा उपलब्ध व्हावा यासाठी संस्थेने पुढील ५ वर्षात किमान ५००० शेतक-यांना शेतीपुरक व्यवसायाची जोड देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम कार्यान्वीत केला असून त्याला संस्थेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात फार मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. त्या शिवाय ग्रामीण लघुउद्योजकांना प्रोसाहीत करुन पर्यटन व्यवसाय पुरक व्यवसाय सुरु करण्यास मार्गदर्शन व अर्थसहाय्य करुन छोटे मोठे व्यवसाय देऊन ग्रामीण बेरोजगांराना स्वयंरोजगाराच्या माध्यतातून पुढील ५ वर्षात १०००० बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगार देण्यासाठी काम चालू आहे. समाजातील अल्प उत्पन्न, मध्यम उत्पन्न गटातील घटकांसाठी त्यांची भविष्यातील स्वप्ने साकारता येतील अशा काही ठेव योजना कार्यान्वीत केल्या असून लहान मुलांवर बचतीचे संस्कार घडविणारी “धनलक्ष्मी ठेव” योजना कार्यान्वीत केली असून आता पर्यंत ४३००० हून अधिक लहान मुलांच्या पालकांनी त्यांची बचतीची खाती सुरू केली असुन ही ठेव योजना लहान मुलांवर बचतीचे संस्कार घडविणारी ठेव योजना म्हणून जनतेमध्ये लोकप्रिय झाली आहे. दरमहा सरासरी २३ लाखाहुन अधिक रक्कम या खात्यांत जमा होत असते. त्याशिवाय अल्प व मध्यम उत्पन्न गटातील सभासदाना त्यांच्या भविष्यातील स्वप्ने साकारण्यासाठी १ वर्षापासून १० वर्षापर्यंतच्या कालावधीच्या एकूण अकरा (११) आवर्तक ठेव योजना कार्यान्वीत करण्यात आल्या असून या योजनेचे ४७००० हून अधिक ठेव खातेदार असून दरमहा साधारण ५ कोटी ५० लाखाहून अधिक रक्कम त्यांच्या आवर्तक ठेव खात्यात जमा करीत असतात. गेल्या वर्षात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरीता “सुकन्या ठेव” व “गृहलक्ष्मी ठेव” नव्याने कार्यान्वीत करुन या ठेव योजनेमध्ये मार्च २०२५ अखेर ३९०१ ठेव खातेदारांकडून रु.३५ कोटी ४७ लाख ठेव रक्कम जमा झाली आहे अशा पध्दतीने आर्थिक घटकांवर बचतीचे संस्कार घडविण्याचे काम संस्थेने केले आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनिय कामाबाबत आर्थिक वर्षात सदिच्छा भेट देऊन संस्थेला शुभेच्छा दिल्या. तसेच माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनीही चालु आर्थिक वर्षात संस्थेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या आणि सन २०२३-२०२४ मध्ये उत्कृष्ट कामकाज केलेल्या सहकारी पतसंस्था म्हणून कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार देऊन संस्थेला सन्मानित केले आहे अशा प्रकारे प्रत्येक वर्षी संस्था आदर्शवत कामकाज करत आहे. संस्था आपल्या सभासदांच्या हिताचे रक्षण करीत असतानाच सहकारातील अन्य संस्थांनाही मार्गदर्शन व शिक्षण प्रशिक्षणाची सोय व्हावी या साठी संस्थेने अद्यावत सहकार प्रशिक्षण केंन्द्र सुरू केले असून या प्रशिक्षण केन्द्रा मार्फत सातत्याने प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून चालु आर्थिक वर्षात दि.१९.०५.२०२४ रोजी “सहकार मेळावा”, दि.१०.०८.२०२४ रोजी जागतिक सहकार दिनानिमित्त “सहकार मेळावा व कार्यशाळा” घेऊन शिक्षण, प्रशिक्षण व मार्गदर्शनाचे काम केले आहे व असेच काम संस्था अखंडपणे करत आहे. सहकाराच्या मुळ उद्देशा प्रमाणे समाजातील आर्थिक दुर्बल व वंचीत घटकांसाठी आर्थिक आधार देणेसाठी व त्यांना बचतीची सवय लागावी यासाठी “सहकार समृध्दी” हा महत्त्वकांक्षी संकल्पपूर्ती आराखडा तयार करण्यात आला असुन तो यशस्वीपणे राबवण्यासाठी संस्थेच्या सर्व हितचिंतकांचा, सभासदांचा आणि सहकाराबद्दल आत्मीयता असणा-वा असंख्य कार्यकार्त्यांचा मोलाचा सहभाग मिळत असुन आपले नियोजीत उद्दिष्ट पूर्ण करण्याची परंपरा आपण याही बाबतीत सिध्द करु. “आपली माणसे आपली संस्था” हे ब्रीद वाक्य ख-या अर्थाने सिध्द करण्यात सहकार्य करणारे ठेवीदार, ग्राहक, संचालक, समन्वयक व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचा वाटा आहे. या सर्वांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी आभार मानले.

Related Articles