सातारा जिल्हाहोम

शामराव पाटील पतसंस्थेला १ कोटी ३१ लाखांचा निव्वळ नफा

अर्थिक वर्षात ३०२ कोटींचा संमिश्र व्यवसाय; चेअरमन शहाजी शेवाळे यांची माहिती

कराड/प्रतिनिधी : –

ग्रामीण भागातील लोकंच्या विश्वासास पात्र ठरलेल्या कै. स्वा. सै. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेला ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात ३०२ कोटींचा संमिश्र व्यवसाय करत १ कोटी ३१ लाखाचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे यांनी दिली. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन सिद्धनाथ घराळ, प्रभारी व्यवस्थापक कृष्णत शिंदे व सर्व संचालक यांची उपस्थिती होती.

अधिक माहिती देताना श्री. शेवाळे म्हणाले, डोंगरी भागातील जनतेची सावकारी पाशातून मुक्ती मिळावी व सर्वसामन्याचे आर्थिक जीवनमान उंचवाव या हेतूने माजी सहकार मंत्री स्व.  विलासकाका पाटील (उंडाळकर), माजी जिल्हाधिकारी दिनकरराव पाटील यांनी स्वा. सै. शामराव पाटील (आण्णा) या बंधुच्या नावाने पतसंस्थेची स्थापना सन १९८१ साली केली. चार दशकांहून  अधिक ग्रामीण भागात २७ शाखांव्दारे अर्थकारण सुरू आहे. रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व तालुक्यातील सहकारी शिखर संस्थांचे मार्गदर्शक अॅड. उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पतसंस्थेची अर्थिक स्थिती भक्कम असून नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात ३०२ कोटींचा संमिश्र व्यवसाय करत व सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा १ कोटी ३१ लाखांचा झाला आहे.

तसेच संस्थेचे वसुल भागभांडवल ११ कोटी १० लाख, निधी १२ कोटी ८० लाख आहेत. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील सभासदांच्या दृढ विश्वासामुळे १७२ कोटी ९० लाख ठेवींचा टप्पा पार केला आहे. ‘अर्थ संचयातून आर्थिक समृद्धी’ची सवय लावून ठेवी संकलन करून जवळपास १२८ कोटी ८९ लाखांचे सभासदांना कर्ज वाटप केले आहे. संस्थेने इतर बॅंकेत ७२ कोटी ४७ लाख सुरक्षित गुंतवणूक केली आहे. तसेच संस्थेचे २१५ कोटी ८६ लाखांचे खेळते भागभांडवल आहे. संस्थेच्या २६ शाखापैकी २१ शाखा संस्थेच्या स्वमालकीच्या जागेत इमारती उभारल्या आहेत. उर्वरित शाखासाठी स्वमालकीच्या इमारती बांधण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. मुख्य कार्यालयासह २६ शाखा संपुर्ण संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करुन अत्याधुनिक बॅंकिग सुविधा देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

तसेच संस्थेचे संचालक मंडळ व सर्व सेवकांनी कर्ज वसुली करून संस्थेचे एन.पी.ए.चे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला असून ते ३.५० टक्के इतके आहे. गेली ४४ वर्ष संस्थेस ‘अ’ वर्ग मिळालेला आहे. संस्थेने सभासदांच्या सोयीसाठी डी.डी. सुविधा, चेक क्लिअरिंग सुविधा, आर.टी.जी.एस, एन.एफ़.ई.टी. लॉकर सुविधा, त्याचबरोबर संस्थेच्या सर्व शाखेत लाईट बिल स्विकारण्याची सुविधा सुरू केली आहे. तसेच पतसंस्था चालू आर्थिक वर्षांपासून कोअर बँकिंग प्रणाली सुरू करण्यात आली असून संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये संस्थेचे व्हा. चेअरमन सिद्धनाथ घराळ, सर्व संचालक, प्रभारी व्यवस्थापक कृष्णत शिंदे, प्रशासन विभाग, कर्ज वसुली विभाग व इतर विभागातील सर्व अधिकारी वर्ग, शाखाप्रमुख व सर्व कुशल सेवक वर्ग, पिग्मी एजंट, सभासद, ठेवीदार आदींचे योगदान आहे.

Related Articles