सातारा जिल्हाहोम

आपला बोलवता धनी कोण – महेशबाबा जाधव 

कराड/प्रतिनिधी : – 
राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांनी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्याविषयी पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्या १०० टक्के खोट्या आहेत. कोणाच्या सांगण्यावरून ते खोटे बोलत आहेत; हे न उलगडणारे कोडे आहे, असा पलटवार महेशबाबा जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकारद्वारे केला आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, आमदार मनोजदादा घोरपडे यांची सुरुवातीपासून भूमिका ही सर्वांना सोबत घेऊन ‘सह्याद्रि’ची निवडणूक लढण्याची होती. परंतु, काही लोकांनाही निवडणूक दुरंगी होऊ द्यायची नव्हती. त्यामुळे कितीतरी वेळा त्यांनी बैठकी मोडण्यात आल्या. वास्तविक, आमदार मनोजदादा घोरपडे केवळ एकाच बैठकीला हजर होते. त्याअगोदर अनेक बैठका मोडण्यात आल्या, त्या का मोडल्या? हे न कळण्याइतपत कराड उत्तरची जनता अडाणी नाही.
धैर्यशीलदादा कदम, रामकृष्ण वेताळ, भिमरावकाका पाटील व संपतराव माने यांच्यासाठी पाच – सहा जागा व निवास थोरात यांच्यासाठी तीन जागा अशा एकूण आठ – नऊ जागा देण्याचे आमदारांनी मान्य केले होते. तरीही हा प्रस्ताव काही लोकांना मान्य न झाल्याने त्यांनी स्वतंत्र पॅनल टाकले.
निवडणूक जाहीर झाल्यापासून आपण वारंवार आमचे नेते आमदार मनोजदादा घोरपडे यांच्याविषयी बोलत आहात, यावरूनच आपला उद्देश स्पष्ट होतो. आपण नक्की कुणाला विरोधक मानून निवडणूक लढली? हे सगळ्यांना कळून चुकलेले आहे. आपण वारंवार आमदारांना विधानसभेला मदत केली, असं वक्तव्य करत आहात. मात्र, मी आपणाला आठवण करून देऊ इच्छितो की, रहिमतपूरच्या सभेमध्ये आपण माजी आमदारांच्या प्रचार सभेमध्ये स्टेजवर उपस्थित होता. आपल्यासाठी एवढा पुरावा भरपूर आहे. तसेच सध्या जो आपण प्रकार चालवलेला आहे, तो पूर्ण चुकीचा असून ज्या २२२१ सभासदांचा तुम्ही उल्लेख करत आहात. तुम्हाला तेवढे सुद्धा मतदान  झालेले नाही, हे विसरून चालणार नाही. आपण म्हणता की, आपला अर्ज आमदार घोरपडे यांनी बाद केला. परंतु, मी आपणास एक प्रश्न विचारू इच्छितो, की जर आपण संस्थेचे देणे लागत नसता, तर आपला अर्ज बाद झाला असता का? कर्ज काढले तुम्ही? ते थकवले तुम्ही? त्यामुळे आपला अर्ज बाद झाला आणि त्याच्यावरती हरकत ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. जर आपण माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे विरोधक असता, तर आपल्या अर्जावर  बाळासाहेब पाटील यांनी हरकत घेतली असती. ती का घेतली नाही? यावरून सर्व स्पष्ट होते. तेव्हा कुणाचे तरी ऐकून आमच्या नेत्यावर बोलाल; तर यापुढे आपल्यावरही बोलण्यास आम्हाला वेळ लागणार नाही, असा इशारा महेशबाबा जाधव यांनी सदर पत्रकाद्वारे दिला.

Related Articles