सातारा जिल्हाहोम

सह्याद्रि कारखान्यात परिवर्तन अटळ – आमदार मनोज घोरपडे

उंब्रज येथे स्व. यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेलची सांगता सभा 

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तरच्या जनतेने २५ वर्षांत आपली काय क्षमता आहे, हे बघितले आहे. कारखाना कसा अडचणीत आणला, हे सभासद जाणून आहेत. सभासद आता फक्त मतदान करण्याची वाट बघत असून स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनेल पाच ते सात हजारांच्या मतांनी विजयी होईल, असा विश्वास आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला.

उंब्रज (ता. कराड) येथे स्व. यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेलच्या सांगता सभेत  ते बोलत होते. यावेळी संपतराव जाधव, सुरेश पाटील, वसंतराव जगदाळे, संपतराव इंगवले, मोहनराव माने, निवासराव निकम, प्रकाश पाटील, शरद चव्हाण, महेशकुमार जाधव, सरपंच योगराज जाधव, आत्माराम जाधव, सुभाष पाटील, गोपीनाथ पाटील उपस्थित होते.

आमदार घोरपडे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांना आम्ही शड्डू मारला नाही. आम्ही स्वार्थासाठी कधी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा वापर केला नाही. चव्हाण साहेबांच्या पुतळ्याभोवती साखरेची पोती लावून आपण विटंबना केली. विधानसभेला आम्ही तुम्हाला शड्डू मारला होता. सहा तारखेला पुन्हा गुलाल टाकून पुन्हा शड्ड मारणार आहे. कारखान्याच्या सध्याच्या कारभारला कंटाळून सभासदांनी निवडणूक हाती घेतली आहे. आमदारकी गेल्यावर साखर मोफत करण्याचे का सुचले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, कारखान्याचे इलेक्शन आले की, उसाला दर देण्याची घोषणा करता. मात्र, साडेआठ हजार सभासद वारसांची नोंद आपण केली नाही. आमच्या हातात कारखाना आल्यानंतर कामगारांना न्याय देवून सभासदांना आजपर्यंतच्या इतिहासातील उच्चाकी दर देऊ. आपण कारखान्यावर कर्ज करून ठेवले, ते फेडण्याची ताकद आमच्यात आहे.

वसंतराव जगदाळे म्हणाले, सह्याद्रि साखर कारखाना चालवण्यासाठी आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले पॅनेल सक्षम आहे. कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून सभासदांचे प्रश्न आम्ही सोडवू.

महेशकुमार जाधव म्हणाले, कारखान्यामार्फत पाणी पुरवठा संस्था चालवल्या जातात. त्यातील बऱ्याच संस्था बंद पडल्या, काही अत्यवस्थ आहेत. उंब्रजची उमेश्वर पाणीपुरवठा संस्था भाऊंच्यामुळे बंद पडली नाही. त्याची जबाबदारी माजी आमदारांनी घ्यायलाच पाहिजे. संस्थांच्या  प्रत्येक वार्षिक सभेला चेअरमन, व्हाईस चेअरमन उपस्थित राहतात. मग तुम्ही कशासाठी उपस्थित राहता. तसेच प्रत्येक संस्थेकडून वार्षिक तपासणी फी कशासाठी आकारता, असा सवाल त्यांनी केला.

यावेळी अधिकराव शिंदे, राहुल शिवाजी यादव, बाजीराव भोसले, जगन्नाथ जाधव, वैभव साळुंखे, सुभाष पाटील, सचिन शिंदे, विकास गायकवाड, गोपीनाथ पाटील, हणमंत साबळे, सचिन जाधव, गणेश जाधव, कामगार नेते नवनाथ पाटील, नंदकुमार जगदाळे, संतोष वेताळ, वासुदेव माने, सुरेश पाटील, वसंतराव जगदाळे, विवेक गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेस अनेक मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles