आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम
अपघाताने मिळालेल्या सत्तेमुळे, काही लोक बेभान झाले – बाळासाहेब पाटील

मसूर / प्रतिनिधी : –
निवडणुका येतात, जातात. हार जीत होते, आम्ही आमचा पराजय स्वीकारला, परंतु अपघाताने मिळालेल्या सत्तेमुळे, काही लोक बेभान झाले, त्यांनी कारखान्यासमोर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या पुतळ्याकडे तोंड करून दंड थोपटले, सुसंस्कृत कराड उत्तर मध्ये ही प्रवृत्ती फोपावत चालली आहे, अशा प्रवृत्तीला सह्याद्रीच्या सुज्ञ सभासदांनी वेळीच चाप लावला पाहिजे असे आवाहन माजी मंत्री, कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केले. ते किवळ खोडजाईवाडी आणि परिसरातील सभासदांच्या किवळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सुसंवाद मेळाव्या प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद भानुदास साळुंखे होते.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजितराव पाटील (चिखलीकर), सातारा जिल्हा परिषदेचे कृषी व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे, माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विजय साळुंखे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक लहूराज जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या सौ संगीता साळुंखे (माई) यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, सह्याद्रीने उच्च ऊस दराची परंपरा कायम ठेवली. कारखाना पुरस्कृत सहकारी तत्त्वावरील उपसा जलसिंचन योजजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन झाले.
कारखाना कार्यक्षेत्रातील सबंध शेतीला शाश्वत पाणीपुरवठा होवू लागला तसेच तरुण पिढीने आधुनिक शेतीचा अवलंब केल्याने राज्यात सर्वत्रच उसाचे उत्पादन वाढले. सध्याच्या विकसित तंत्रज्ञानामुळे पूर्वीपेक्षा अलीकडच्या काळात आडसाली उसाचे प्रमाण जास्त झाल्याने उस वेळेत जात नसल्याची अडचण सर्वच सहकारी तत्वावरील कारखान्यांना निर्माण झाली आहे सभासदांच्या मागणीनुसार कारखाना व्यवस्थापनाने हाती घेतलेला विस्तारवाढ प्रकल्प पूर्णत्वास आला आहे त्यामुळे येत्या हंगामापासून प्रतिदिन 13000 मे. टन प्रमाणे उसाचे गाळप करण्यात येणार असून ऊस वेळेत जाण्यास मदत होणार आहे.
नोंदविलेल्या संपूर्ण ऊसाचे गळीत करण्याचे धाडस सह्याद्रिकडे आहे.
कारखान्याने स्थापन केलेल्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आणि कृषी महाविद्यालयामध्ये सभासदांच्या मुलांना विना डोनेशन प्रवेश दिला जातो.
कारखान्याच्यावतीने हिरवळीच्या खताचे बियाणे, जैविक खताचे वितरण केले जाते. त्याचाही लाभ कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद मोठ्या प्रमाणात घेतात.
सह्याद्रीचा ऊस वजन काटा अचूक आहे तो मुख्य रस्त्यालगत आहे, या वजन काट्यावर कोणीही आपले वजन करू शकतो. कांही खाजगी कारखान्यांवर वजन काट्याच्या आसपास उभे राहू दिले जात नाही. सह्याद्विला ऊस तोडणी यंत्रणा कधीच कमी पडत नाही. सह्याद्रि कारखान्यावर जसा सन्माननीय सभासदांचा विश्वास तसा ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचा विश्वास आहे. ऊस वजन काटे अचूक आहेत, ऊस वाहतूकीची बिले वेळेत दिली जातात, ॲडव्हान्स वेळच्या वेळी दिला जातो, यंत्रणेला राहण्याची, पिण्याच्या पाण्याची तसेच येण्याजाण्याची आणि त्यांच्या एकूणच सुरक्षिततेची काळजी घेतली जाते, म्हणूनच सह्याद्रिला ऊस तोडणी यंत्रणा कधीच कमी पडत नाही.
2800 ते 2900 रुपये दर देणारे काही खाजगी कारखानदार स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सहकारात आदर्शवत ठरलेल्या आणि 3254 रुपये ऊस दर देणाऱ्या सह्याद्री कारखान्याची निवडणूक लढवत आहेत, त्यांना तो नैतिक अधिकार आहे का? याचा सह्याद्रीच्या स्वाभिमानी सभासदांनी विचार करावा. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सह्याद्रिची बदनामी करू नका, स्वाभिमानी सभासद बदनामी खपवून घेणार नाहीत.
याप्रसंगी कारखान्याची माजी संचालक तानाजीराव जाधव, बाळासाहेब जगदाळे, कराड पंचायत समितीचे माजी सदस्य अशोकराव संकपाळ, पाडळीचे सरपंच भानुदास जाधव, उमेदवार संतोष घार्गे, राजेंद्र चव्हाण, नेताजी चव्हाण, अरविंद जाधव, दिनकर शिरतोडे यांचेसह सुनील पोळ, धीरज पाटील, रमेश जाधव, कांतीलाल जाधव, कारखान्याच्या माजी संचालिका प्रांजली साळुंखे, रामभाऊ साळुंखे, आर पी साळुंखे (सर), प्रदीप काशिद, कैलास साळुंखे, सोसायटीचे चेअरमन सुहास साळुंखे, रामराव साळुंखे, शिवाजी साळुंखे (सर), सतीश साळुंखे, शिवाजी साळुंखे, काकासाहेब साळुंखे, सुनील साळुंखे, किवळ आणि खोडजाईवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व सूत्रसंचालन सुनील साळुंखे यांनी केले, आभार संदीप चव्हाण (सर) यांनी मानले.