सातारा जिल्हाहोम

सर्व विरोधक एकवटून सह्याद्रीचा लढा देणार – निवासराव थोरात 

कराड/प्रतिनिधी : – 

सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिवर्तन करण्यासाठी सर्व विरोधकांना एक वटून लढा देणार असल्याची माहिती निवासराव थोरात यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात
सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उद्योजक बाबुराव पवार, उमेश मोहिते, जयसिंग चव्हाण, वसंत पाटील, भरत चव्हाण,यशवंत चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

श्री. थोरात म्हणाले, फक्त निवडणूक लढवणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी काम करीत नाही. तर ‘सह्याद्रि’च्या सर्व सभासदांना समान न्याय मिळवून देण्यासाठी माझा लढा चालू आहे. सभासदांच्या आग्रहामुळेच ‘सह्याद्रि’च्या निवडणूक रिंगणात उतरलो आहे. पण, काहींनी मला थांबवण्यासाठी माझ्याविरोधात बरीच कटकारस्थाने केली. मात्र, प्रादेशिक सहसंचालकांनी माझा अर्ज वैध ठरवला असून हा सत्याचा विजय आहे. माझी लढाई यशवंत विचारांची आहे. मी पातळी सोडून राजकारण करत नाही, कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत नाही. त्यामुळे माझा उमेदवारी अर्ज अवैद्य ठेवण्यासाठी ज्यांनी आटापिटा केला, माझी बदनामी केली, त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही.

ते म्हणाले, सह्याद्रि कारखान्याच्या २,२२१ सभासदांना मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी मी निकराने पाठपुरावा केला. तेव्हाही सत्याचाच विजय झाला होता. सभासदांनीच मला या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे सभासदांचा हा लढा मी पूर्ण ताकदीने लढणार आहे. आता सभासदांनी कोणत्याही प्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

Related Articles