सत्ताधारी, विरोधकांवर अंकुश राहण्यासाठी लढाई – राजू शेळके

कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांवर अंकुश रहावा, या हेतून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही भूमिका बजावत आहोत. ही निवडणूक आमच्यासाठी एकप्रकारचे आंदोलनच आहे. त्यादृष्टीने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांच्या अर्जवर आम्ही हरकत घेतली. आमची हरकत बरोबर असल्यानेच त्यांचा अर्ज बाद झाला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिली.
सह्याद्रि कारखान्याची निवडणूक लढवण्याबरोबर उमेदवारांच्या अर्जावर हरकत घेण्यापाठीमागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षाच्या वतीने सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, उत्तम साळुंखे, रामचंद्र साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बापूसाहेब साळुंखे, दादासाहेब यादव आदींची उपस्थिती होती.
श्री शेळके म्हणाले, सह्याद्रि कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या उमेदवारांवर विरोधकांनी हरकत घेतली. मात्र, सत्ताधारी गटाकडून विरोधकांच्या प्रमुख उमेदवारांच्या उणिवा माहित असतानाही त्यांच्यावर हरकत घेतली जात नव्हती. त्यामुळे ही त्यांची ‘बी’ टीम तर नाही ना? अशी शंका आमच्या मनात आली. म्हणूनच आम्ही निवास थोरात यांच्या अर्जवर हरकत घेतल्याचा पुनरोच्चार त्यांनी केला. तसेच सह्याद्रि कारखान्यात परिवर्तन व्हावे, अशी आमचीही इच्छा आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या पॅनेलमध्ये आम्हाला स्थान दिले, तर ठीक. नाहीतर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार असल्याची भूमिकाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
ते म्हणाले, मुळात ऊस दराच्या प्रश्नावरून स्वाभिमानीचा जन्म झाला आहे. सह्याद्रि कारखाना प्रत्येक वर्षी तोट्यात दाखवला जात आहे. आजवर स्वाभिमानीची लढाई कंपाउंडपर्यंत होती. ती आता कंपाऊंडच्या आत गेली आहे. म्हणून या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही फक्त सहाच उमेदवारी अर्ज भरले आहेत. मात्र, विरोधी पँनेलकडे इच्छुकांची संख्या भरपूर असल्याने त्यांच्याकडून नाराज होणाऱ्यांना बरोबर घेऊन या निवडणुकीत प्रसंगी आम्ही तिसरे पॅनेल उतरवू, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.