दिवंगत सीताबाई गायकवाड यांना मान्यवरांची श्रद्धांजली

पुणे / प्रतिनिधी : –
भारतीय उद्योग क्षेत्रात प्रभावी काम करणारे भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) चेअरमन हणमंतराव गायकवाड व त्यांना साथ देणारे बंधु दत्तात्रेय गायकवाड यांच्या मातोश्री सीताबाई गायकवाड (वय ७०) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानिमित्ताने श्री क्षेत्र देवाची आळंदी येथे इंद्रायणी काठाजवळ शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. “बीव्हीजी परिवाराचा विस्तार करण्यासाठी आईची प्रेरणा असल्याचे हणमंतराव गायकवाड त्यांच्या भाषणाद्वारे नेहमी सांगत असतात.” पतीच्या निधनानंतर अत्यंत हलाकीच्या काळात मुलांना उच्चशिक्षीत करण्यासाठी सीताबाईंनी कष्ट केले होते. पुणे महानगर पालिकेत शिक्षीका म्हणून त्यांनी सेवा बजावली होती. शिक्षण मंडळाच्या आजी माजी शिक्षकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर समाज प्रवाहातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज शिवाजी महाराज मोरे शोकसभेचे अध्यक्ष होते. यावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त भावार्थ देखणे, दत्त संप्रदायचे शिवानंद स्वामी, श्री समर्थ ग्रुपचे यशवंत कुलकर्णी, इस्कॉनचे परमात्मा प्रभू, भागवताचार्य आत्माराम शास्त्री, उद्योजक उमेश माने, अर्थतज्ज्ञ अनिश जव्हेरी, संत भगवान गडाचे सचिव गोविंद घोळवे, योगेश अत्रे, माजी आमदार विलास लांडे, भाऊसाहेब भोईर, राहुल बालवडकर, ज्ञानेश्वर तापकीर, राहुल कलाटे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मोरे म्हणाले, ” जगतगुरु तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला यंदा ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने गाथे मध्ये जेवढे अभंग आहेत, तेवढे वृक्षरोपन आम्ही बीव्हीजीच्या साथीने करणार आहोत. मातोश्री सीताबाई यांचे कार्य वृक्षांच्या माध्यमातून अजरामर ठेवण्याचा आमचा संकल्प आहे.”
देखणे म्हणाले, ” सीताबाई गायकवाड यांनी कुटूंब व बीव्हीजी परिवारावर जे संस्कार केले. त्या संस्कारामुळेच बीव्हीजी १ लाख कर्मचारी असलेली संस्था म्हणून लौकिक मिळवत आहे. शरीर रूपाने जरी त्या आपल्याला सोडून गेल्या असल्या तरी त्यांच्या संस्कारामुळे त्या अमर झाल्या आहेत.”
कार्यक्रमाचे संयोजन बीव्हीजी परिवाराने केले होते. सूत्रसंचालन रवी घाटे यांनी केले.