सातारा जिल्हाहोम
Eaayush Man
Send an email
प्रतापगड व कोयना पर्यटनाला चालना देणार – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
जिल्ह्यातील माजी सैनिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार
31 1 minute read

कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्राला मोठा ऐतिहासिक वारसाला व नैसर्गिक साधन संपत्ती लाभली आहे. त्यामुळे राज्यातील एकूणच पर्यटन स्थळांसह सातारा जिल्ह्यातील पर्यटन जागतिक स्तरावर कसे नेता येईल. त्याचबरोबर प्रतापगड आणि कोयना पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने निश्चितपणे आपण प्रयत्न करणार असल्याचे मत राज्याचे नवनियुक्त पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथम जिल्ह्यात आल्यानंतर कराड येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. यावेळी कराड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व त्यांच्या समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
ते म्हणाले, सातारा जिल्ह्यातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रतापगडावर सर्व पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन जाणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतापगड संवर्धनासाठी एक प्रस्ताव मंजूर केला होता, तोही पुढे नेऊन त्यात अधिक सुधारणा करण्याचे काम करणार आहे. तसेच कोयना पर्यटनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्याच्या निविदाही निघाल्या आहेत. दुसऱ्या टप्प्याचा प्रकल्प आराखडा करण्याचे काम सुरू आहे. त्याचीही बैठक मुंबईत लवकरच घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाटण तालुक्याच्या पर्यटन वाढीसाठी मोठा वाव आहे. कोयना पर्यटन, जल पर्यटन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वन पर्यटनला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील कास पठार, बामणोली, महाबळेश्वर, पाचगणी, वासोटा अशा पर्यटनस्थळांना जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी सकारात्मकता दर्शवले असून त्या कामाला लवकरच गती मिळाल्याचे दिसेल.
ते पुढे म्हणाले, सातारा माजी सैनिकांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगे गावातील घरटी एक माणूस सैन्यदलात कार्यरत आहे. उद्या मंगळवारी आपण त्या गावात जाऊन जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या प्रलंबित कामांचा सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेणार असून ते प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही मंत्री देसाई यांनी सांगितले.
पालकमंत्री पदाबाबत रस्सीखेच नाही
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे? या प्रश्नावर बोलताना मंत्री देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत कोणत्याही प्रकारची रस्सीखेच नाही. पालकमंत्री कोणाला करायचे? याचे सर्वाधिकार महायुतीच्या तिन्ही नेत्यांना आहेत. ते ज्याच्याकडे जबाबदारी देतील, ती सर्वजण पूर्णपणे पार पाडतील.
31 1 minute read