येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मी तुमच्या सोबत – पृथ्वीराज चव्हाण

कराड/प्रतिनिधी : –
विधानसभेची निवडणूक आपण सर्वजण लढलो. पुढील काळ कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा आहे. त्या निवडणुकांना सामोरे जाण्याचा गंभीर विचार करणे गरजेचे आहे. मी तुमच्या सोबत ठामपणे उभा आहे. चार महिन्यात अनेक घडामोडी होतील. राज्य सरकारची कृत्ये उघडकीस आल्यानंतर कदाचित लोकं विचार बदलतील. असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
पाचवडेश्वर येथील आनंद मल्टीपर्पज हॉल मध्ये झालेल्या कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी अजितराव पाटील – चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, युवा नेते इंद्रजित चव्हाण, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विद्याताई थोरवडे, मलकपूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, गीतांजली थोरात, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश देशमुख, माजी सदस्य नामदेव पाटील, राजेंद्र चव्हाण, मलकापूरचे माजी नगरसेवक प्रशांत चांदे, बाजार समितीचे संचालक संभाजी चव्हाण, संजय तडाखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. चव्हाण म्हणाले, लोकसभेनंतर लगेचच चार महिन्यात निवडणुकांचे चित्र असे वेगळे दिसेल. यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. परंतु, आपण लोकशाहीवर विश्वास ठेवून मिळालेला निकाल स्वीकारला. राज्यातील वातावरण हे एकंदरीत प्रक्रियेबाबत संशयाचे आहे. निवडणुकीत हार जीत ही होतेच. परंतु सरसकट राज्याचाच निकाल इतका एकतर्फी लागणे सर्वसामान्य मतदारांच्या मनात संशय निर्माण करणारे आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने जनतेच्या मनातील संशय दूर करण्याचे काम करणे अपेक्षित होते. विचार सोडून पळून जाण्याचे काम खरा कार्यकर्ता करत नाही. मला कराडच्या जनतेने भरभरून प्रेम दिले. कराड दक्षिणच्या मातीचे उपकाराची परतफेड करण्याची मला संधी मिळाली. व या संधीतून तुमच्या सर्वांच्या एकत्रित बळावर कराडची वेगळी ओळख निर्माण करण्यात यश आले.
ते म्हणाले, काँग्रेसने देशात लोकशाही आणली. भारतीय संविधानाचा लोकशाही हा आत्मा आहे. विधानसभेतील निवडणुकीनंतर लोकशाही जिवंत आहे का? हा सामान्य माणसाच्या मनात प्रश्न आहे. निवडणुकीचा निकाल धक्कादायक होता. लोकसभा निवडणुकीनंतर इतकी परिस्थिती बदलेल असे वाटत नाही. पारदर्शक, मुक्त वातावरणात निवडणुका होत नाहीत. ईव्हीएम प्रक्रियेबाबत प्रत्येक नागरिकाला शंका आहे. काँग्रेसने पुढील निवडणुका मतदान प्रक्रियेने झाली पाहिजे, याकरिता देशव्यापी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. जर्मनीने या प्रक्रियेवर संविधानिक आक्षेप घेतला आहे.
ते पुढे म्हणाले, सद्य परिस्थितीला आपल्याला सामोरे गेले पाहिजे. जिल्ह्याला यशवंतराव चव्हाण यांनी विचार दिला. तो विचार तात्पुरता लुप्त झाला आहे. कॉन्ट्रॅक्टर व त्यांचे एजंट यांचे राज्य आले आहे. काँग्रेस नेहमी संघर्षातून पुढे आली आहे. शासनाने याआधी पुकारलेल्या योजनांना अटी व शर्ती घातल्या आहेत. १४०० कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला सरकारने मान्यता दिली आहे. यामध्ये जाहीर केलेल्या योजना कशा पुढे नेणार आहेत. याची चिंता वाटते. तोडा, झोडा नीतीला आपण सामोरे गेले पाहिजे. महात्मा फुले, छत्रपती शाहू व आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुढे आणण्याची गरज आहे.
अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व आम्हाला मान्य असून, हेच हिंदुत्व टिकवण्याची गरज आहे. महात्मा गांधींनाही हिंदुत्व मान्य होते. ते शेवटी ‘हे राम’ म्हणाले होते. या निवडणुकीचे सिंहावलोकन करून पुढे जाणे गरजेचे आहे. लाडकी बहीण योजना, मोफत वीज, धार्मिक तेढ या बाजूवर महायुतीने काम केले. ईव्हीएमबाबत सर्वत्र शंकास्पद वातावरण आहे. या परिस्थितीत संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. कार्यकर्त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली पाहिजे. सामान्य माणसापर्यंत पोहचले पाहिजे. नेता आणि कार्यकर्ता बरोबर चालला तर संघटनेला उभारी देवू शकतो. विलासराव पाटील – उंडाळकर व पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील मूलभूत सुविधा पूर्णत्वास नेल्या आहेत. कार्यकर्त्यांनी वैचारिक पातळीवर काम करत गाव पातळीवर आपली संघटना मजबूत करणे गरजेचे आहे.
प्रा. धनाजी काटकर म्हणाले, समाजाची अपेक्षा जाणून घेणे गरजेचे आहे. येणाऱ्या निवडणुका सक्षमपणे लढणे गरजेचे आहे. पृथ्वीराज बाबांनी एवढी विकासकामे केली आहेत कि पुढील किमान 10 वर्षे तरी कुणापुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही. स्वाभिमानाने प्रत्येकाने कार्य पुढे नेले पाहिजे.
भानुदास माळी म्हणाले, जिल्हा व गाव पातळीवरील संघटन भक्कम करणे गरजेचे आहे. प्रत्येक निवडणुकीत झोकून देवून प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे. यावेळी जिल्हा परिषद गटानुसार कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. विद्याताई थोरवडे यांनी आभार मानले.
भाजप व आरएसएसचा खरा विचार पुढे आला
देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यातून भाजप व आर एस एस चा खरा विचार पुढे आला आहे. अमित शहा यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवत आहे. या विरोधात आंदोलन करण्याच्या सूचना होतील, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.