सातारा जिल्हाहोम

विधानसभेला जनतेने दिलेला कौल मान्य – शरद पवार

कराड/प्रतिनिधी : –

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ते म्हणाले, या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. परंतु, हा जनतेने दिलेल्या कौल आहे, तो मान्य करावाच लागेल. पराभव झाला म्हणून ईव्हीएम व मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित करणे योग्य होणार नाही. त्याबाबतची माहिती घेवूनच यावर अधिक बोलणे उचित ठरेल, असे मत माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी व्यक्त केले.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील माने, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील उपस्थित होते.

ते म्हणाले, महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. तसेच जर महायुतीचे सरकार सत्तेतून गेले, तर लाडकी बहिण योजना बंद होईल, अशी भीती निवडणूक प्रचारातून घालण्यात आली. त्यामुळे हे सरकार गेल्यास आपल्याला पुढील हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत, या भीतीने महिलांनी उत्स्फूर्त मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याने महायुतीला मोठे बहुमत मिळाल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमचा विश्वास नक्कीच दुणावला होता. परंतु, जनतेने अनपेक्षितपणे कौल दिला. मात्र, या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता, असे म्हणणे चुकीचे आहे. आपले वय झाल्याने आपण थांबावे, असे बोलले जात आहे. मात्र, मी काय करावे, याबाबत मी आणि माझे सहकारी ठरवतील.

तसेच बारामतीमध्ये मी घरातील उमेदवार दिला नसता, तर सर्वत्र वेगळा संदेश गेला असता. असे सांगताना ते म्हणाले, अजित पवार यांचा राजकीय अनुभव आणि दुसरीकडे युगेंद्र पवार यांच्यासारख्या नवखा उमेदवारांमध्ये होणाऱ्या लढतीच्या निकालाची आम्हाला कल्पना होती. त्यांच्या दोघांची तुलना होऊ शकत नाही. अजित पवार यांना मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या, हे मान्य करावे लागेल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची हा निकाल न्यायप्रविष्ठ असला, तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मान्यता आपल्याकडे असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

Related Articles