महिला व मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ – के. एन. पाटील
‘अधःपतन नितीमूल्यांचे - कारणे व उपाय’ विषयावरील परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद

कराड/प्रतिनिधी : –
महिला व मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांबाबत पोलीस व न्यायालय जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहे. सध्या पालक आपल्या कामांत व्यस्त झाल्याने त्यांचे मुलांकडे लक्ष नाही, हे दुर्दैव आहे. पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाहीत. त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी असून महिला आणि मुलींनीही स्व:संरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत, असे मत कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी व्यक्त केले.
येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात कराड नगरपालिका व छत्रपती शिवाजी उद्यान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अधःपतन नितीमूल्यांचे – कारणे व उपाय’ या विषयावरील परिसंवादात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माई फौंडेशनच्या अध्यक्षा संगिता साळुंखे, प्रा. मेघा कुमठेकर, डॉ. गायत्री भोसेकर, शिवाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका संजीवनी पवार, मानसोपचार तज्ज्ञ प्रा. डॉ. प्रकाश दरूरे, इरफान सय्यद, पत्रकार प्रमोद तोडकर यांनी आपली मते मांडली. परिसंवादाचे सूत्रसंचालन अॅड. संभाजीराव मोहिते यांनी केले.
प्रा. मेघा कुमठेकर म्हणाल्या, अलिकडे मुलांमध्ये श्रद्धा, आदर कमी झाला असून मुले परीक्षार्थी बनली आहेत. मुलांनी ठामपणे आणि विचारपूर्वक कृती केली पाहिजे. पालकांनी समुपदेशन केले पाहिजे. संगिता साळुंखे म्हणाल्या, संगोपनाची सुरुवात गर्भाशयात होते. घरामध्ये जेवताना, वागताना मुलगा, मुलगी फरक केला जातो, इथेच मुलांमध्ये स्त्रियांबद्दल तुच्छता, कमीपणाची भावना निर्माण होते. म्हणून कुटुंबातच मुलींना बरोबरीने, सन्मानाने वागवले पाहिजे.
डॉ. भोसेकर म्हणाल्या, नैतिकता या शब्दाचे हल्ली गांभीर्य राहिलेले नाही. प्रत्येकाने आपला विवेक जागृत ठेवला पाहिजे, विवेक म्हणजे चांगले व वाईट यांची जाणीव असणे, चांगले वाईट ओळखण्याची क्षमता असली पाहिजे. पालकांचा मुलांशी नेहमी संवाद असला पाहिजे. संजीवनी पवार म्हणाल्या, पुर्वीची एकत्र कुटुंबपद्धती योग्यच होती. समाजातील या घटनांमुळे समाज अस्वस्थ बनला आहे. मुलांना संयमी करण्यासाठी निरोगी मन व शिस्त पाहिजे. प्रा. डॉ. प्रकाश दरूरे यांनी नैतिक मूल्यांबाबत मानसशास्त्रीय माहिती सांगितली. इरफान सय्यद यांनी संयम महत्वाचा असून स्वतःचे अधिकार स्वत:ला माहिती असणे गरजेचे असल्याचे सांगितले. पत्रकार प्रमोद तोडकर यांनी प्रसार माध्यमांनी भूमिका काय असावी? याबाबत सविस्तर विवेचन केले. अॅड. संभाजीराव मोहिते यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
सुपर अॅकॅडमी, कोटा अॅकॅडमी, पोतदार इंग्लिश मिडीयम, शिक्षण मंडळ, आयडिएल कोचिंग क्लासेस, एसटीसी अॅकॅडमी, जनकल्याण शिक्षण संस्था, चाटे क्लासेस आदी संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. परिसंवाद यशस्वी करण्यासाठी कराड नगरपरिषद कराड, छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप, विजय दिवस समारोह समिती, एनव्हायरी फ्रेंड्स नेचर ग्रुप, शिवाजीनगर हौसिंग सोसायटी, सजग पालक मंच, चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदी सहयोगी संस्थानी परिश्रम घेतले.