सह्याद्रि कारखाना कार्यक्षेत्रातील 18 गावे सोडण्यास नकार
वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत; सभासदांनी सहकारी कारखान्यालाच ऊस द्यावा - आ. बाळासाहेब पाटील

कराड/प्रतिनिधी : –
सह्याद्रि कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 18 गावांमध्ये कारखान्याने इरिगेशन संस्था उभारल्या असून जामीन म्हणून कारखाना आहे. या परिसरातील लोकांचे जीवनमान उंचावण्याचे काम सह्याद्रि कारखाने केले असल्याने तेथील अनेक लोकांनी गावे वगळण्यासाठी विरोध केला आहे. सभेने या ठरावास मंजुरी द्यावी, असे आवाहन आ. बाळासाहेब पाटील यांनी केले. संचालक जशराज पाटील यांनी ऐनवेळेच्या विषयांमध्ये हा विषय मांडला. त्यास सभासदांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 18 गावे सोडण्यास सहमती न देण्याचा ठराव या सभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा विषय पत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर होऊन चेअरमन आ. बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत सभासद, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी माजी आ. मोहनराव कदम, कारखान्याचे संचालक जशराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, कराड तालुकाध्यक्ष देवराज पाटील, माजी शिक्षण व अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, माणिकराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक लहुराज जाधव, व्हा. चेअरमन लक्ष्मीताई गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील म्हणाले, सहकारी साखर कारखान्यांनी रस्ते करायचे, पाणीपुरवठा संस्था निर्माण करायच्या आणि ऊस मात्र खाजगी कारखान्याला घालायचा, ही गंभीर बाब आहे. सहकारी कारखान्याकडे ऊस येण्याची काळजी सर्वांनी घ्यावी. सर्व सभासद, ऊस उत्पादकांचा सर्व ऊस नेण्याची जबाबदारी सहकारी साखर कारखाना पार पाडेल, अशी ग्वाही आ. बाळासाहेब पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, देशामध्ये जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दलचा देशपातळीवरील व्दितीय क्रमांकांचा पुरस्कार सह्याद्रि कारखान्याला सलग चौथ्यांदा प्राप्त झाला मिळाला. कारखान्यालगत असणाऱ्या 33 हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन केले जात असून धनगरवाडी-हणबरवाडी योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने हणबरवाडी-शहापूर योजना सुरु झाली आहे. सभासदांच्या मागणीनुसार साखर घेण्यासाठी ऑनलाइन पेमेंटची सुविधा देण्यात येणार आहे.
विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन व मागील सभेचे प्रोसिडिंग भास्कर कुंभार यांनी वाचून कायम केले. संचालक मानसिंगराव जगदाळे यांनी आभार मानले.