माणसातील पूर्णत्वाचा आविष्कार म्हणजे शिक्षण – प्रा. सुचिता पाटील
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात शिक्षकदिन उत्साहात साजरा

कराड/प्रतिनिधी : –
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची व आत्मज्ञानाची जाणीव करून दिली पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी निर्भय होतील. विद्यार्थ्यांची श्रम व कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत. स्वामी विवेकानंदांना देखील स्वावलंबन अभिप्रेत होते. माणसामध्ये असणा-या पूर्णत्वाचा आविष्कार म्हणजे शिक्षण होय, असे मत प्रा. सुचिता पाटील यांनी व्यक्त केले.
येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षकदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रो. (डॉ.) सतीश घाटगे होते, तर पर्यवेक्षक प्रा. सुरेश रजपुत यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. सुचिता पाटील म्हणाल्या, स्वतःचे विचार असणारे, चारित्र्यसंपन्न, नीतिमान विद्यार्थी घडविण्याची आज गरज आहे. मुलाची आई पहिली शिक्षिका असते. औपचारिक आणि अनौपचारिक असे दोन प्रकारचे शिक्षण असते. परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षकांना गुरूदेव कार्यकर्ता संबोधले. विद्यार्थ्याच्या मनातील अज्ञान दूर करणारा, संवेदनशील विद्यार्थी घडविणारा शिक्षक त्यांना अपेक्षित होता. माणुसकी जपणारी, स्त्रियांचा सन्मान करणारी पिढी निर्माण करण्याचे आव्हान आज शिक्षकांपुढे आहे.
प्रो. डॉ. सतीश घाटगे यांनी शिक्षकांनी स्वयंमूल्यमापन करून स्वतःच्या बलस्थानांचा शोध घेण्याचे सांगितले. कोणताही विद्यार्थी मूलतः हुशार किंवा मंद नसतो. त्याच्या आयुष्याला आकार देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. सर्वांनी माणूस म्हणून विद्यार्थ्यांकडे बघण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रा. विश्वनाथ सुतार तसेच अमृता डवरी व साई कोळी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. उज्ज्वला पाटील यांनी केले, तर प्रा. सुरेश यादव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. शीतल गायकवाड यांनी केले. आभार प्रा. विनायक जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.