आयुष्यमान स्पेशलसातारा जिल्हाहोम

नव्या ‘स्वराज्य संग्राम’ संघटनेची तानाजीराव शिंदे यांनी केली कराडमध्ये घोषणा 

संघटनेची कार्यकारिणी जाहीर; 15 सप्टेंबरला पंढरपूरमध्ये पहिले अधिवेशन होणार 

कराड/प्रतिनिधी : –

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळावर दर्शन घेऊन कराडसारख्या पवित्र नगरीमध्ये स्वराज्य संग्राम या संघटनेची घोषणा करीत आहोत. या संघटनेच्या निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीची घोषणा करत येत्या 15 सप्टेंबरला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे स्वराज्य संग्राम संघटनेचे पहिला अधिवेशन बोलवण्यात आले असून यावेळी संघटनेची पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येईल, अशी माहिती स्वराज्य संग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अजितराव बानगुडे आणि अनंतराव देशमुख यांची प्रदेश उपाध्यक्ष, तर विक्रांत आम्रे यांची प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी संघटनेचे राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अध्यक्ष श्री. शिंदे म्हणाले, स्वराज्य संग्राम संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये समान नागरी कायदा लागू करावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे स्मारक समुद्रामध्ये उभारावे, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे, महाराष्ट्रातील शेतकरी वाचवण्यासाठी शासनाने एकवेळ संपूर्ण कर्जमाफी करावी, वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी स्वराज्य संग्राम हा लढा उभा करीत असल्याचे त्यांनी सांगतले.

ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत. परंतु, किल्ले रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराची होत असलेली पडझड व गळती थांबवण्यासाठी सरकारच्या वतीने मंदिराची डागडुजी वा जीर्णोद्धार करण्यात यावा, राज्यात सुरू असलेली कंत्राटी भरती थांबून कायमस्वरूपी भरती करत विद्यार्थी, युवकांना न्याय देण्यात यावा, सारथी संस्थेची व्याप्ती वाढवून सर्व विभागांमध्ये ते काम सुरू करावे, महिलांच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी कायमस्वरूपाच्या योजना आखाव्यात, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने थेट कर्ज योजना सुरू करावी, अशा प्रकारची भूमिका घेऊन स्वराज्य संग्राम महाराष्ट्रामध्ये या पुढच्या काळात लढा उभा करणार आहे. त्यासाठी येत्या 15 सप्टेंबर श्रीक्षेत्र पंढरपूर येथे स्वराज्य संग्राम संघटनेचे पहिले अधिवेशन बोलवण्यात आले असून अधिवेशनामध्ये संघटनेची पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे, नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी अभिवादन करून स्वराज्य संग्राम संघटनेची घोषणा केली. यावेळी संघटनेच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्वांचे स्वागत केले.

Related Articles