अण्णा भाऊ साठे हे संपूर्ण जगाने गौरवलेले महान लेखक – अंकल सोनवणे
जीवनगौरव पुरस्काराने अंकल सोनवणे सन्मानित, अन्य पुरस्कारांचेही मान्यवरांना वितरण

कराड/प्रतिनिधी : –
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे जात आणि धर्मात कधीच बंदिस्त झाले नाहीत, तर ते जातीबाहेर, राज्याबाहेर, देशाबाहेरही आपल्या कर्तुत्ववाने पोहोचले. म्हणूनच ते जागतिक पातळीवरील महत्वाचे लेखक म्हणून जगभर स्वतःची ओळख निर्माण करू शकले, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ समाजसेवक यादवराव तथा अंकलजी सोनवणे यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे अण्णा भाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती सोहळ्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (कराड) यांच्या वतीने अंकल सोनवणे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर (कोल्हापूर) हे होते. समितीचे अध्यक्ष प्रमोद तोडकर यांनी प्रास्ताविक, कार्यक्रमाची रूपरेखा मुख्य संयोजक प्रकाश वायदंडे यांनी मांडली. यावेळी कैलास पवार, प्रतापराव उर्फ पोपटराव साळुंखे, ॲड. संभाजीराव मोहिते, बोधी फौंडेशन, कराड यांना समाजगौरव, तर मुलूखमाती या ग्रंथास प्रा. हरी नरके स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. शरद गायकवाड म्हणाले, महापुरूषांना जात आणि धर्म नावाच्या भिंगातून पाहण्याचा भारतीय समाजाला सनातन संसर्गजन्य अदृश्य रोग जडलेला आहे, तो दूर होणं अत्यावश्यक आहे. तरच अखिल मानव जातीच्या उद्धारासाठी काम करणार्या महापुरूषांचा, महामानवांचा खरा इतिहास, त्यांचे जीवनचरित्र पुढील समाजाला समजणार आहे.
डॉ. अशोकराव चौसाळकर म्हणाले, लेखकाच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याचे साहित्य जेव्हा तळागळातील सामान्य लोकांकडून वाचले जाते. तो श्रेष्ठ दर्जाचा साहित्यिक असतो. अण्णाभाऊ आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. प्रत्यक्ष हयातीत त्यांना मराठी साहित्यिकांकडून न्याय मिळाला नाही. त्यांची फार मोठी उपेक्षा झाली. परंतु, अण्णा भाऊ आपल्या वाणी आणि लेखनीने आजही अजरामर आहेत.
सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते व प्रा. दिपक तडाखे, संजय तडाखे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव, विनोद भोसले, संग्राम पवार, प्रा. दिपाली वाघमारे, नितीन आवळे आदिंची उपस्थिती होती.
दुसर्या सत्रामध्ये ‘मुजरा शाहिराला’ हा ज्ञानप्रबोधन कलामंच पुणे, शाहीर चंदन कांबळे यांच्या प्रबोधन गीतांचा कार्यक्रम झाला.