नराधमांना फाशी व राज्यकर्त्यांनी राजीनामा द्यावेत – सत्यजितसिंह पाटणकर
पाटणला भर पावसात निषेध मोर्चा; हजारोंची उपस्थिती

पाटण/प्रतिनिधी : –
बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर केलेल्या अत्याचारातील संबंधित नराधमांना फाशी द्यावी. तसेच राज्यात महिला तरुणी आणि अल्पवयीन मुलींवर वाढलेले अत्याचार व अन्याया विरोधात शासनाने तातडीने कठोर भूमिका घेत कारवाया कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केली.
तासेह्क महिलांवरील अत्याचाराचे हे लोन तालुक्यातील तारळेपर्यंत पोहोचले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींच्या कार्यकर्त्यांना प्रशासनावर दबाव टाकून मोकाट सोडले जाते, अशा घटनांचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. संबंधित राज्यकर्त्यांनी नैतिकतेची चाड बाळगत राजीनामे द्यावेत, अशी मागणीही यावेळी सत्यजितसिंह पाटणकर यांनी केली. मोर्चानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
बदलापूर घटनेसह महिला, अल्पवयीन मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधासाठी पाटण येथे सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भर पावसात निषेध मोर्चा काढला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
श्री. पाटणकर म्हणाले, बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर शाळेच्या कर्मचाऱ्याने अतिशय घृणास्पद अत्याचार केला. या घटनेच्या विरोधात समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. अशा नराधमांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. दुर्दैवाने ज्यांच्या हाती राज्याची सत्ता आहे, असे राज्यकर्ते या अपप्रवृत्तींच्या विरोधात आवाज उठवण्याऐवजी ज्यांच्यावर अन्याय झालाय, त्यांचाच आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी पाटण तालुक्यातील तारळे येथेही एका महिलेवर स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी अन्याय, अत्याचार केला. संबंधित महिलेने पोलिसांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथेही राजकीय दबाव टाकून कार्यकर्ते गुन्हेगारांना सोयीस्कररित्या यातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे देशात, राज्यातच नव्हे; तर आता हे विकृतीचे लोण थेट पाटण तालुक्यापर्यंत पोहोचले आहे. राजकीय सत्तेचा वापर आपल्याच माय माऊलींच्या विरोधात करणाऱ्या अशा अपप्रवृत्तींविरोधात आता सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन लढण्याचा निश्चय केला आहे. या दुर्दैवी घटनांना जबाबदार व गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांनी नैतिकतेची चाड बाळगून आपला राजीनामा द्यावा, अशी मागणी पाटणकर यांनी केली.
यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाप्रमुख सुरेश पाटील, मनसेचे तालुका प्रमुख गोरख नारकर, सुभाषराव पवार, संजय इंगवले, विद्या म्हासुर्णेकर, मीनाज मोकाशी, सोनल फुटाणे, सौ. गायकवाड, सौ. डावखरे, सौ. हादवे आदी मान्यवर पदाधिकारी, महिला, विद्यार्थिनी आदींनी निषेधात्मक विचार व्यक्त केले. चंद्रकांत मोरे यांनी आभार मानले.
यावेळी अॅड. अविनाश जानुगडे, दिनकरराव घाडगे, विलासराव क्षीरसागर, दिपकसिंह पाटणकर, नगराध्यक्षा सौ. मंगल कांबळे, उपनगराध्यक्ष सागर पोतदार, नगरसेवक, नगरसेविका, विविध पक्ष, संघटना, संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, नागरिक व विद्यार्थी, विद्यार्थिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.